- संजय निरुपम यांचा आरोप; डिनो मोरियासह आदित्यचीही चौकशी करा
28-May-2025
Total Views | 20
मुंबई, मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी बुधवार, दि. २८ मे रोजी केला. या प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया यांची चौकशी सुरू असून, त्याची आदित्य ठाकरे यांच्याशी घनिष्ट मैत्री असल्याने आदित्य यांचीदेखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.
बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरुपम म्हणाले, “मिठी नदीच्या सफाईसाठी गेल्या २० वर्षांत १ हजार २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले, तरीसुद्धा ही नदी आजही पूर्णपणे स्वच्छ झालेली नाही. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट असून, राज्य सरकारने याबाबत विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या घोटाळ्यात पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन दलाल व दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. २००५ ते २०२२ दरम्यान मुंबई महापालिकेत उबाठा गटाचे वर्चस्व होते आणि त्या काळात मातोश्रीच्या परवानगीशिवाय कोणालाही कंत्राट मिळत नसे, हे सर्वश्रुत आहे”, असा दावा त्यांनी केला.
डिनो मोरियावर आरोप करताना निरुपम म्हणाले की, “तो फक्त या प्रकरणात सहभागी नाही, तर मुंबईतील ड्रग्ज रॅकेटमध्येही त्याचे नाव चर्चेत आहे. तसेच, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि डिनो मोरियावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या दोघांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे”, अशी मागणी निरुपम यांनी केली. ही प्रकरणे केवळ राजकीय वाद नाहीत, तर मुंबईकरांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. त्यामुळे सत्य समोर येण्यासाठी योग्य आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.