मुंबई : महाराष्ट्रासह कर्नाटकात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस मेघगर्जनेसह होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांसह केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस दिल्ली-‘एनसीआर’मध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. मात्र, पावसाची फारशी शक्यता नाही. तापमानात हळूहळू वाढ होईल. शहरातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस शनिवारी नोंदवले गेले आहे.
मुंबई, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी या काही ठिकाणी वादळी वार्याचा वेग ३०-४० किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.दरम्यान, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगण आणि ओडिशामध्ये कमाल तापमान ३८-४० अंशच्या श्रेणीत आहे. तर वायव्य भारत, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये तापमान सामान्यपेक्षा दोन-तीन अंश सेल्सिअसनं कमी होते. या वातावरणामुळे अवकाळीचा धोका वाढला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील चार दिवसांत उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये तापमानात हळूहळू दोन-चार अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता असून महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगण आणि अंतर्गत भागात विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात तापमान सर्वसाधारण होण्याची शक्यता आहे. तसेच, ओडिशा वगळता देशातील बहुतांश भाग पूर्वपदावर येणार असल्याचाही अंदाज आहे.