मुंबई : ठाकरे-शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर मविआने जनप्रक्षोभक मोर्चा घेत फडणवीस-शिंदे सरकारवर निशाणा साधला. उबाठा नेते आदित्य ठाकरेंनी सभेनंतर ठाणे पोलिस आयुक्तालय गाठले. यावेळी केवळ युवराज 'लाईमलाईट'मध्ये दिसले, तर इतर ठाण्यातील महत्वाचे नेते सायडींगला होते. या मोर्चात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, अनिल परब, खासदार विनायक राऊत, माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह अन्य नेतेमंडळी होते. अर्थात मोर्चाची गर्दी मुंबईहून आणल्याने सर्वस्वी आदित्य ठाकरेंवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली 'वज्रमुठ सभा' पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मविआने अधिक अधोरेखित केल्याचं चित्र पाहायला मिळालं. या सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार, जयंत पाटील असे दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते. मात्र, त्यावेळी मविआचे प्रमुख नेते म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नेता म्हणून प्रत्येकाने त्यांचा भाषणात आदरपूर्वक उल्लेख केला. त्यांच्यासाठी सर्व नेत्यांपेक्षा वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांची मंचावर सर्वात शेवटी एन्ट्री झाली, तेव्हा आसमंतात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
ठाकरेंना ४० आमदार सोडुन गेले. पक्ष फुटला, सत्ता गेली. लोकांच्या मनात सहानुभुती निर्माण झाली. ठाकरेंबद्दलची सहानुभुती सोडता, मविआकडे सरकार टीका करण्यासारखा दुसरा कोणताच मुद्दा नाही आहे. बाळासाहेबांचा वारस म्हणुन मविआमध्ये ठाकरे आडनावाचा वलय आहे. आणि याचाच फायदा शरद पवाराचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा पक्ष घेत आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिकांवर, संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंवर या सर्वाचा परिणाम, पुनरावृत्ती कुठेतरी ठाण्याच्या जनप्रक्षोभक यात्रेत दिसुन आली. सर्व नेत्यांच्या अखेरीस युवराजांना भाषण करण्याची संधी मिळाली.