नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील आशिया खंडातील सर्वांत मोठ्या ट्युलिप उद्यानास गेल्या 10 दिवसात तब्बल 1 लाख 35 हजारांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे.आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवराच्या काठी, सिराज बाग चष्माशाही आणि जबरवान टेकड्यांच्या पायथ्याशी सुमारे 30 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. हे उद्यान 2008 साली खुले करण्यात आले आहे. याध्ये 68 जातींच्या ट्युलिपची लागवड करण्यात आली आहे.
सध्या हे उद्यान रंगबिरंगी ट्युलिपने बहरले असून सुमारे 16 लाख फुले पाहून येथे येणारे पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. ट्युलिपचे सरासरी आयुष्य कालावधी केवळ तीन ते चार आठवडे असते, परंतु अतिवृष्टी किंवा तीव्र उष्णामुळे ते त्यांच्या सामान्य आयुष्याच्या कालावधीपेक्षा खूप लवकर नष्ट होऊ शकतात. अशा स्थितीत पर्यटकांना अतिशय कमी कालावधीसाठी या उद्यानाचा आनंद घेता येतो.
यंदाच्या वर्षी काश्मीरमध्ये वसंत ऋतुस लवकर प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बहरलेल्या उद्यानास गेल्या दहा दिवसांमध्ये या उद्यानास तब्बल 1 लाख 35 हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. स्थानिक प्रशासनाने उद्यानामध्ये पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. त्याचप्रमाणे ओपन एअर कॅफेटेरियादेखील सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हंगामाअखेरपर्यंत लाखो पर्यंटक भेट देतील आणि त्यामुळे मागील विक्रम मोडीत निघतील, असा विश्वास श्रीनगर महानहरपालिका आणि फ्लोरिकल्चर विभागाने व्यक्त केला आहे.
दहशतवादात घट, पर्यटनात वाढ
प्रदेशात पर्यटन विकासाचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये झालेली लक्षणीय घट. जम्मू - काश्मीरमध्ये 2018 साली दहशतवादाच्या 417 घटना घडल्या होत्या, त्यामध्ये 2021 साली 229 एवढी लक्षणीय घट झाली आहे. कलम 370 हटवल्यानंतर आणि केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर जम्मू-काश्मीरचा सातत्याने विकास होत आहे. दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्यामुळे येथील गुंतवणुकीत चौपट वाढ झाली आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना येथे पोहोचणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.