मुंबई : 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गाण्यातील 'भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा' या वाक्यातील भीमथडी याचा अर्थ भीमा नदीच्या किनारी वसलेले एक गाव ज्याचे १९४७ पर्यंत नाव भीमथडी होते आणि १९४७ नंतर हे नाव बदलून या गावाचे नाव बारामती असे करण्यात आल्याची काहीशी स्पष्टता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा' अर्थात 'महाराष्ट्र गीत' या गाण्याची पुनरावृत्ती 'महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आली असून याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी शरद पवार बोलत होते.
शाहीर साबळेंचे 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणे 'महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या निमित्ताने पुनर्निर्मिती करण्यात आले असून यंदा हे गाणे गायक आणि संगीतकार अजय गोगावले याच्या आवाजात आपल्याला ऐकावयास मिळणार आहे. या गाण्याचे लोकार्पण मंगळवार दिनांक २५ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एक काळ असा होऊन गेला की काही लोकांचे,कलावंतांचे आणि त्यांचे योगदान महाराष्ट्रातील घराघरामध्ये जाऊन पोहचले. जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे शाहिरांच्या तोंडून ऐकल्यानंतर समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती एका वेगळ्याच दिशेला जात असे, असा अनुभव देखील पवारांनी यावेळी व्यक्त केला.
तर हे गीत आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला समर्पित करायचे असून ती शाहिरांना दिलेली एक मानवंदनासुद्धा आहे. आणि ती अर्पण करण्यास मराठीतील आजचे १८ कलाकार एकत्र आले आहेत. हे गाणे चित्रपटासाठी जरी नव्याने करण्यात आले असले तरी, शाहिरांच्या या गाण्याचा आबा, मानसन्मान, त्याच दर्जा, प्रतिष्ठा तशीच राखण्यात आल्याचे यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.