नवी दिल्ली : भारतातील डोंगराळ भागामध्ये दळणवळण मजबूत करण्यासाठी येत्या ५ वर्षात १२०० किमीहून अधिक लांबीचे २५० रोपवे प्रकल्प विकसित केले जाणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ऑस्ट्रियातील इन्सबर्क येथे केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ऑस्ट्रियातील इन्सबर्क येथे अल्पाइन तंत्रज्ञानासाठी अग्रगण्य असणाऱ्या 'इंटरलपिन 2023 फेअर' या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, “पर्वतमाला परियोजना” अंतर्गत, भारत सरकार 5 वर्षांमध्ये रोपवेसह 1,200+ किमी लांबीचे 250+ प्रकल्प विकसित करण्याची योजना आखत आहे, असे गडकरी यांनी सांगितले. भारत सरकारच्या 60% योगदान समर्थनासह हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारीवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही "मेक इन इंडिया" उपक्रमांतर्गत रोपवे संबंधित उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहोत, असे ते म्हणाले.
शाश्वत आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी , विद्यमान रोपवे मानकांच्या वाढीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि भारतीय पायाभूत सुविधांना अधिक उंचीवर नेत असताना या परिवर्तनाच्या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आम्ही ऑस्ट्रियन आणि युरोपियन उद्योगांना प्रोत्साहित करत आहोत, असे गडकरी यांनी सांगितले. सुखावह आणि पर्यावरण पूरक रोपवे प्रवासी वाहतुकीचा मार्ग मोकळा करणाऱ्या उच्च तंत्रज्ञान उपायोजन, नाविन्यपूर्ण डिझाइन, उत्कृष्ट दर्जा आणि कार्यक्षमता प्रदान करणाऱ्या रोपवे यंत्रणेच्या जगातील आघाडीच्या उत्पादकांच्या प्रदर्शनांनाही गडकरी यांनी भेट दिली.
२०२४ – २५ पर्यंत देशात १० हजार किमीचे डिजीटल महामार्ग
एनएचएआय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशभरात वर्ष 2024-25 पर्यंत 10 हजार किमीचे ऑप्टिक फायबर केबल्सच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर काम करत आहे. राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स व्यवस्थापन लिमिटेड - एन एच एल एम एल ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्पेशल पर्पज व्हेईकल संस्था असून या संस्थेद्वारे डिजिटल महामार्गांचे जाळे विकसित करण्यासाठी एकात्मिक उपयुक्तता कॉरिडॉर तयार केले जात आहेत. दिल्ली - मुंबई द्रुतगती मार्गावर 13,67 किमी आणि हैदराबाद - बंगळुरू मर्गिकेवरील 512 किमी मार्गांची डिजिटल महामार्ग विकसित करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
देशभरात दुर्गम भागात आणि टोकावरच्या गावांपर्यंत इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी ऑप्टिक फायबर केबल्सचे जाळे जलद गतीने विकसित करण्यासाठी मदत होणार असून त्याद्वारे 5- जी, 6- जी हे अत्याधुनिक नेटवर्क तंत्रज्ञान सुरू करता येईल. अलीकडेच उद्घाटन झालेल्या 246 किमी लांबीच्या दिल्ली दौसा लालसोट या दिल्ली मुंबई द्रुतगती महामर्गाच्या पट्ट्यावर तीन मीटर रुंदीचा समर्पित ऑप्टिकल फायबर केबल्स घातल्या गेल्या आहेत. यामुळे या पट्ट्यातील सर्व प्रदेशात इंटरनेट सेवा दिल्या जातील. राष्ट्रीय महामार्गावर ह्या केबल्स टाकण्याचे काम सुरू झाले असून येत्या वर्षभरात ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.