उत्तर प्रदेशमधील एक कुख्यात गुन्हेगार पोलीस चकमकीत ठार होतो आणि देशभरातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. संघटित गुन्हेगारीचे राज्य अशी ज्या उत्तर प्रदेशची पूर्वी ओळख होती, ती आज पुसली गेली असून, विकासाचा रोज नवा अध्याय तिथे लिहिला जात आहे. हे योगी आदित्यनाथ यांचेच यश म्हणावे लागेल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ’ ही ओळख पुन्हा एकदा सार्थ ठरवली आहे. कुख्यात अतिक अहमदचा मुलगा असद हा पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारांमध्ये घबराट पसरली. त्याचवेळी ‘माफिया राज’चे निर्मूलन केल्याबद्दल सामान्य जनता त्यांचे अभिनंदन करत असून, त्यांचे आभार मानत आहे. या गुन्हेगारांना ज्या राजकारण्यांनी पाठीशी घातले, ते मात्र ही चकमक बनावट असल्याची ओरड करत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश विधानसभेत बोलताना ‘माफियाराज आपण संपुष्टात आणू,’ असे निक्षून सांगितले होते, ते त्यांनी प्रत्यक्षात आणल्याचे दिसून येते. म्हणूनच त्यांनी अखिलेश यादव यांना उद्देशून दिलेला हा इशारा समाजमाध्यमांवर वार्याच्या वेगाने पसरला आहे. देशभरातून योगी आदित्यनाथ यांचे कौतुक होत आहे. उमेश पाल हत्या प्रकरणातील आरोपी अतिक अहमदचा मुलगा असद याला उत्तर प्रदेश पोलिसांनी झाशी येथील चकमकीत ठार केल्यानंतर ही चकमक सर्वत्र चर्चेत आली.
खरंतर काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधील संघटित गुन्हेगारी ही प्रमुख समस्या होती. उत्तर प्रदेशमधील राजकारण्यांनी बळ दिलेले बाहुबली, ही समाजाला लागलेली कीड होती. तिला ठेचण्याचे काम योगी यांनी केले. याची सुरुवात त्यांनी 2017 मध्येच झाली होती. स्थानिक गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी त्यांनी 90 पेक्षा अधिक कैद्यांना कारागृहातून इतरत्र हलवले होते. यात अनेक कुख्यात गुन्हेगारांचा समावेश होता. मुख्तार अन्सारी, मुन्ना बजरंगी, अतिक अहमद, शेखर तिवारी, मौलाना अन्वारुल हक, मुकीम उर्फ काला, उदयभान सिंग उर्फ डॉक्टर, टिटू उर्फ किरणपाल, राकी उर्फ काकी आणि आलम सिंह यांचा समावेश होता. हे सर्व गुन्हेगार कारागृहात असले, तरी तेथून त्यांनी आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवलेल्या होत्या. खून, अपहरण, दरोडा, खंडणी हे त्यांचे उद्योग बंद करण्याकरिता त्यांना अन्य कारागृहात हलवण्यात आले होते. त्यानंतर गुन्हेगारांना कोणतीही दयामाया न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येऊ लागली. अनेक चकमकी उडाल्या. त्यात गुन्हेगार ठार झाले, पोलीस हुतात्मा झाले. योगी यांचा धसकाच गुन्हेगारांनी घेतला. जे गुन्हेगार जामिनावर बाहेर होते, त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर रातोरात आपला मुक्काम हलवला. आपला ‘एन्काऊंटर’ होऊ नये, म्हणून पोलीस ठाण्याच्या दारात कित्येक गुन्हेगारांनी अक्षरश: लोटांगण घातले. योगी यांचा धसका त्यांनी घेतला होता, हेच त्यातून सिद्ध होते. अर्थात यामागे योगी आदित्यनाथ यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर यावी, याकरिता घेतलेली अथक मेहनतही होती. गुन्हेगारांविरोधात शून्य सहनशीलता, हे योगी सरकारचे धोरण राहिले आहे. म्हणूनच 2017 पासून उत्तर प्रदेशात एकंदरीत दहा हजारांपेक्षा जास्त चकमकी झाल्या. यात तब्बल 183 गुन्हेगार ठार झाले, तर 13 पोलीस जवान हुतात्मा झाले आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हेगारांच्या विरोधात जी मोहीम हाती घेतली, त्याचेच हे फळ आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल, तर गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करता येते, हे उत्तर प्रदेशातील उदाहरणावरून स्पष्ट होते. अतिक अहमद याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. उमेश पाल खून प्रकरणासह 100 हून अधिक गुन्ह्यांत त्याचे नाव आहे. याच अतिकचा असद हा मुलगा. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या चकमकीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत या चकमकीच्या सत्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सपाप्रमुख अखिलेश यादव यांनीही चकमक बनावट असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा, हा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘एमआयएम’चे ओवेसी यांनीही अशा चकमकी होत असतील, तर न्यायालयीन यंत्रणांची गरजच काय? असे म्हणत योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. मात्र, उमेश पाल यांच्या पत्नी जया पाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. ‘त्यांनी जे केले, ते खूप चांगले केले आहे. न्याय झाला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचवेळी अतिकचे पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ तसेच दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए -तोयबा’शी संबंध असल्याची माहिती उघड होत आहे. अशा देशद्रोही गुन्हेगाराविरोधात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कठोर कारवाई करत असतील, तर तिचे स्वागतच करायला हवे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वेळोवेळी योगी यांच्या कार्याचे यथोचित कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी संपुष्टात आणून योगी यांनी तेथे अथकपणे विकास कार्य केले आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या तेथे गुंतवणूक करत आहेत. या उद्योगपतींनीही योगी यांचे कौतुकच केले आहे. हा वेगळाच विषय आहे. महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनीही महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी विरुद्ध मोहीम हाती घेतली होती. त्याचे महाराष्ट्रातील जनतेने स्वागतच केले होते. याचे स्मरण या निमित्ताने झाले. इतकेच!