भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सीव्ही रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लावलेल्या रामन परिणामाच्या स्मरणार्थ, दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात साजरा केला जातो. या वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन २०२३ ची थीम ’जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान’ आहे. या विषयी माहिती देणारा हा लेख...
विज्ञान म्हणजे नक्की काय? विज्ञान दोन गोष्टींना एकत्रितपणे म्हणता येईल. एक म्हणजे विज्ञान हे ते ज्ञान आहे, जे आधीच शोधलेल्या गोष्टीने बनते आणि पुढे नवीन ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रियेला म्हणजेच निरीक्षण आणि प्रयोगाद्वारे, चाचणी आणि गृहितक वापरुन शोधलेल्या ज्ञानालादेखील विज्ञान असे म्हणता येते. एक प्रजाती म्हणून मानवाने केलेली अफाट प्रगती फक्त विज्ञानामुळेच शक्य झाली आहे, यात शंकाच नाही. मानवाची जाणून घेण्याची जिज्ञासा, कुतूहलापोटी, विज्ञानाने निर्माण होते आणि हेच कुतूहल मानव जातीची सर्वात महत्त्वाची क्षमता आहे. ही क्षमता आपल्याला आपल्या दैनंदिन समस्यांवर उपाय शोधण्यास प्रवृत्त करते आणि आपल्याला विश्वाच्या महान रहस्यांची उत्तरे शोधण्याची ताकद देते.
जरी आज काही लोक हवामान परिस्थितीला, वैज्ञानिक प्रगती आणि वैज्ञानिक शोधांना जबाबदार धरत असले, तरी हे समजून घेणे आवश्यक आहे की, विज्ञानाच्या चुकीच्या आणि अनियोजित वापरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. किंबहुना, ‘ग्लोबल वार्मिंग’ आणि हवामान बदलाच्या आपल्या समस्यांवर एकमेव संभाव्य उपाय म्हणजे विज्ञान आणि वैज्ञानिक प्रगती हाच आहे. विज्ञान हे ज्ञानाचे आणि प्रगतीचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे व त्याची एक विशिष्ट भूमिका आहे. या वैज्ञानिक प्रगतीतच आपल्या समाजाच्या फायद्यासाठी विविध उपाय दडलेले आहेत. उदाहरणार्थ, ज्ञान आणि शिक्षण सुधारणे, तंत्रज्ञानाचा विकास, मानवतेचा एकूणच सर्वांगीण विकास आणि जीवनाचा उच्च दर्जा इत्यादी. कुठल्याही देशाच्या वैज्ञानिकांमुळे आणि शास्त्रज्ञांमुळे निश्चितपणे त्या देशाची प्रगती होऊ शकते आणि देश विकसित होऊ शकतो, हे सगळेच जाणतात. याच संदर्भात, भारतात, दरवर्षी दि. २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिन, डॉ. सी. व्ही. रामन यांनी लावलेल्या ‘रमन इफेक्ट’ या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. दरवर्षी, या विशिष्ट दिवशी, भारत सरकार विविध क्षेत्रांतील शास्त्रज्ञांचा, त्यांच्या विज्ञानातील अमूल्य योगदानाबद्दल सत्कार करते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्ट लोकांमध्ये जीवनातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे, हा आहे. सी. व्ही. रामन यांनी दि. २८ फेब्रुवारी, १९२८ रोजी अधिकृतपणे घोषित केले की, त्यांनी ‘रमन इफेक्ट’चा शोध लावला आहे. त्यानंतर त्यांच्या ह्या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. ‘नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी कम्युनिकेशन’ (NCSTC)ने या कामगिरीला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी दि. २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. यानंतर, भारत सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला आणि दि. २८ फेब्रुवारी, १९८७ रोजी पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
‘रमन इफेक्ट’ नक्की काय, तर पाण्यातून बाहेर पडताना प्रकाशाचे किरण ज्या पद्धतीने विखुरतात त्या प्रक्रियेला ‘रमन इफेक्ट’ असे म्हटले जाते. समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का आहे, हे या ‘रामन इफेक्ट’च्या अभ्यासावरून स्पष्ट होते. प्रकाशाच्या ह्या विखुरण्याला आता जगभर ‘रामन स्कॅटरिंग’ (Raman Scattering)असेदेखील म्हटले जाते. ‘लॅब’मध्ये जेव्हा या इफेक्टचा वापर काही संशोधनात केला जातो, तेव्हा या प्रक्रियेला ‘रामन स्पेक्ट्रोस्कोपी’ (Raman Spectroscopy) असेही म्हणतात. याचा वापर रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सामग्रीचे विश्लेषण (Material Analysis)करण्यासाठी करतात. आहे की नाही ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट? सध्या, ‘रामन स्पेक्ट्रोस्कोपी’ हे पर्यावरणीय आणि पर्यावरणविषयक अभ्यासातील एक प्रमुख संशोधन साधन आहे आणि समुद्राच्या पाण्यातील आणि इतर जलसाठ्यांमधील प्रदूषणाच्या अभ्यासात याची महत्त्वाची भूमिका आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचा प्राथमिक उद्देश आहे विज्ञानात रुची निर्माण करणे आणि लोकांना, विशेषत: विद्यार्थ्यांना नवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरित करणे. जेणेकरून त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीनतम घडामोडींची जाणीव होईल. या दिवशी अनेक वैज्ञानिक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.दरवर्षी, राष्ट्रीय विज्ञान दिन, विज्ञानाच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करणारी संकल्पना किंवा थीम घेऊन साजरा केला जातो आणि भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग ‘थीम’ निवडतो. या वर्षी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ११ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मीडिया सेंटर’ येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन २०२३’ या विषयावर ‘ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबीईंग’ अर्थात ‘जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान’ या थीमचे प्रकाशन केले. कार्यक्रमात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री, भूविज्ञान राज्यमंत्री, पीएमओ, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळमंत्री, डॉ. जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनावरील कार्यक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूक्ष्म मार्गदर्शनाबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. या वर्षाच्या थीमचा उद्देश प्रतिभावान भारतीयांना ‘सायलो वर्किंग कल्चर’मधून बाहेर येण्यासाठी आणि थीम-आधारित प्रकल्पांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.
‘सायलो वर्किंग कल्चर’ ही अशी पद्धत आहे, ज्यामध्ये बहुतेक काम बंद प्रयोगशाळेत आणि गुप्ततेमध्ये चालते. ही पद्धत आता जुनी आणि जीर्ण झाली असून, शास्त्रज्ञांनी आता एकत्रित होऊन संशोधन करायची गरज आहे, असे जगभर म्हटले जाऊ लागले आहे. कारण, हे इंटरनेट आणि ‘नेटवर्किंग’चे युग आहे. त्यामुळे अलिप्त राहण्यापेक्षा संवादात आणि संपर्कात राहून जास्त प्रगती शक्य आहे.डॉ. जितेंद्र सिंग पुढे म्हणाले की, “ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबीईंग’ची थीम भारताने ‘जी २०’चे अध्यक्षपद ग्रहण केल्याच्या समक्रमित आहे. या ‘जी २०’मध्ये भारत आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील विकसनशील देशांचा आवाज बनेल. त्यांनी असेही सांगितले की, भारताने राष्ट्रांच्या समितीमध्ये जागतिक दृश्यमानता प्राप्त केली आहे आणि भारत, हवामान बदल कमी करणे आणि शाश्वत विकासाचा समावेश असलेल्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी परिणामाभिमुख जागतिक सहकार्यासाठी तयार आहे. ते म्हणाले, जेव्हा चिंता, आव्हाने आणि ‘बेंचमार्क’ने जागतिक परिमाण ग्रासले केले आहे, तेव्हा निवारणदेखील जागतिक स्वरूपाचेच असले पाहिजे.
उद्याचा राष्ट्रीय विज्ञान दिन लोकांना विज्ञानाचा, त्यांच्या दैनंदिन जीवनावर कसा प्रभाव पडतो आणि सामाजिक विकासाला हातभार लावतो, याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी देतो. अनेक वैज्ञानिक केंद्रे आणि संस्था याप्रसंगी वैज्ञानिक वादविवाद, स्पर्धा, व्याख्याने आणि सार्वजनिक भाषण कार्यक्रम आयोजित करतात.विज्ञानातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची संधी म्हणूनही ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणार्या वैज्ञानिक समस्या आणि वादविवादांवर माहिती देणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिल जातो. मानवी प्रगतीला अनेक मार्गांनी साजरी करण्याची ही एक संधी आहे आणि सर्व वयोगटातील लोकांना वैज्ञानिक शोध आपले जीवन कसे सुधारू शकतात, याची जाणीव करून देण्यासाठी विज्ञान दिन महत्त्वाची गोष्ट आहे. हा दिवस वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देतो आणि लोकांना प्रोत्साहन देतो, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करतो.राष्ट्रीय विज्ञान दिन-२०२३ रोजी तुम्ही तुमचा दिवस कसा घालवायचा ठरवला आहे? बघा, जवळच्या वैज्ञानिक केंद्राला किंवा महाविद्यालयाला भेट द्या, बघा तरी, देशात काय काय वैज्ञानिक प्रगती झाली आहे आणि होणार आहे.
-डॉ. मयूरेश जोशी