कधी काळी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानात एकापाठोपाठ एक दहशतवादी मारले जात आहेत. अज्ञातांकडून या घटना घडत असल्याचे समजते. त्यामुळे नेमके या घटनांच्या मागे आहे तरी कोण, या प्रश्नाचे उत्तर तूर्त कुणाकडे नाही आणि ते असले तरी ते जाहीर करण्यासारखेही नाही. अमेरिकेतील काही माध्यमांनी या प्रकरणी भारतीय गुप्तचर संघटना ’रॉ’ आणि ’आयबी’कडे अंगुलीनिर्देश केला आहे. अर्थात, खोडसाळपणा करण्याची अमेरिकी माध्यमांची ही परंपरा तशी जुनीच. पण, एक मात्र निश्चित की, गेल्या काही वर्षांत भारताची ’रॉ’ तसेच ’आयबी’ या गुप्तचर संघटना अधिक सतर्क आणि सक्रियपणे काम करत आहेत. देशातील अतिरेकी कारवायांमध्ये झालेली लक्षणीय घट हा त्याचच परिणाम. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती हस्तगत करून, शत्रूंच्या संभाव्य कारवाईचा इशारा देण्याचे कसबही या गुप्तचर संघटनांनी साध्य केले आहे. त्यामुळे त्यांची चर्चा होणे स्वाभाविकच.
भारतात दहशतवादी कृत्ये करून, पाकिस्तानाच्या आश्रयास जाणार्या, दहशतवाद्यांची संख्या दरवर्षी हजारोंच्या घरात असते. त्यात मोठी घट झाली आहे. वर्षभरात २३६ दहशतवाद्यांची संशयास्पदरित्या हत्या झाली. यातील बहुतांश दहशतवादी भारतविरोधी कारवायांत सक्रिय होते, हे विशेष. पाकिस्तानात एकीकडे दहशतवादी कृत्यांमध्ये ७९ टक्के वाढ झाली असताना, दुसरीकडे दहशतवादी ठार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे भारतविरोधी कारवाया करून, पाकिस्तानच्या आश्रयास गेलेल्या या दहशतवाद्यांना आता तेथे असुरक्षित वाटू लागले आहे. अन्य कोणत्याही देशात आश्रय मिळण्याची सूतराम शक्यता नसल्याने, हे दहशतवादी स्वतःच दहशतीखाली वावरत आहेत. आता तिथे कधी कुणाची हत्या होईल, हे सांगणे कठीणच. त्यामुळे बहुतांश दहशतवादी भूमिगत झाल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही तर मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम यास विष देण्यात आल्याची बातमी गेल्या आठवड्यात माध्यमांमध्ये गाजली. त्यात नेमके तथ्य किती, हे सांगता येत नसले तरी भारता- विरोधात कारवाया करणारे दहशतवाद्यांची अखेरची घटका समीप आल्याचे ताज्या घटनांवरून दिसते.
गुप्तचर संघटनांनी दुसर्या देशात शिरकाव करून, आपल्या शत्रूंची हत्या करण्याचे प्रकार दुसर्या महायुद्धापूर्वी वाढले. १९४०च्या काळात जर्मन हुकूमशहा अॅडाल्फ हिटलरच्या काळात त्या देशाची गुप्तचर संघटना ’गेस्टापो’ने रशिया, फ्रान्स आणि पोलंड या देशांत जाऊन, तेथे असलेल्या जर्मन विरोधकांची हत्या किंवा अपहरण केल्याची नोंद इतिहासात आढळते. त्यानंतर महासत्ता म्हणून उदयास आलेल्या अमेरिकेची ’सीआयए’ आणि रशियाची ’केजीबी’ या गुप्तचर संघटनांनी अनेक देशांत धुमाकूळ घालत, आपले इप्सित साध्य केले. त्यानंतर इस्रायलने आपल्या शत्रूंचा निपात करण्यासाठी, ‘मोसाद’ची मुहूर्तमेढ रोवली. या ‘मोसाद’ची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. त्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मितीही झाली. ’मोसाद’प्रमाणेच हल्ली भारतीय गुप्तचर संघटनेचे नाव जगभरात चर्चेत येते, ही बाब भारतीयांसाठी अभिमानाचीच म्हणायला हवी!
पूर्वीच्या काळी भारतात ‘केजीबी’, ’सीआयए’चा हस्तक्षेप किंवा पाकिस्तानी ’आयएसआय’चा हात असल्याच्या बातम्या येत होत्या. आता पाकिस्तानात एखादा दहशतवादी मारला गेला, तरी भारतीय गुप्तचर संघटनांकडे बोट दाखवले जाते. भारताचा धाक केवळ शेजार्यांनाच वाटतो, असे नाही तर महासत्तादेखील उल्लेख करतात, ही जरब दुर्लक्षित करता येणार नाही. पाकिस्तानी ’इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट अॅण्ड सिक्युरिटी स्टडीज’नुसार २०२२च्या तुलनेत २०२३ मध्ये पाकिस्तानात दहशतवादी घटनांत ७९ टक्के वाढ झाली. त्यानुसार देशभरात २७१ दहशतवादी हल्ले झाले. पहिल्या सहा महिन्यांत ३८९ मृत्यू, ६५६ जखमी झाले, तर २३६ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. खैबरपख्तुनख्वा या प्रांतात सर्वाधिक घटना घडल्या. दक्षिण-पश्चिम पाकिस्तानात दहशतवादी कृत्ये वाढली, तर याउलट भारतात घट झाली. या सर्व घटना पाहता, दहशतवादी कृत्ये करून पाकिस्तानच्या आश्रयास जाणार्या, दहशतवाद्यांना आता पाकिस्तानातच असुरक्षित वाटू लागले आहे. भारतासाठी नक्कीच दिलासादायक, अशी ही बाब!