मुंबई : प्रखर राष्ट्रवादाचे कालातीत विचारधन निर्माण करून 'कालजयी' ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समर्पित 'निवडक कालजयी सावरकर' या दै. 'मुंबई तरुण भारत' प्रकाशित पुस्तकाचे दि. २३ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे प्रकाशन होणार आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'ने सावरकर जयंतीनिमित्त आजवर प्रसिद्ध केलेल्या 'कालजयी सावरकर' विशेषांकामधील निवडक लेखांचे संकलन असलेले हे पुस्तक लवकरच सावरकरप्रेमींच्या भेटीला येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मृत्यूंजय दिनाचे औचित्य साधत दै. ‘मुंबई तरुण भारत’, पतित पावन मंदिर संस्था, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि ’एसपी महाजनी फाऊंडेशन’ यांच्या सहयोगाने 'निवडक कालजयी सावरकर' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात शनिवार, दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ५० वर्षांच्या दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या होत्या. तुरुंगातून सावरकरांना मोकळे केल्यानंतर, दि. २४ डिसेंबर रोजी पुणे येथे शनिवारवाड्यात आयोजित कार्यक्रमात या दिवसाला ’मृत्युंजय दिन’ म्हणून घोषित करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘निवडक कालजयी सावरकर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला सावरकरप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 'भारतीय विचार दर्शन'चे अध्यक्ष सुश्रुत चितळे, दै. 'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार, दै. ’मुंबई तरुण भारत’चे मुख्य व्यवसाय अधिकारी उमेश रॉय चौधरी, स्पेस सेलिंग मॅनेजर आनंद वैद्य, 'रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी'च्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, पतित पावन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष अॅड. प्रदीप (बाबा) परुळेकर, 'एसपी महाजनी फाऊंडेशन'चे अॅड. प्रशांत पाध्ये, भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रमुख आणि माजी आमदार बाळ माने तसेच 'निवडक कालजयी सावरकर' प्रकाशन नियोजन समितीचे निमंत्रक डॉ. सुजय लेले यांनी केले आहे.