शहरातील सर्व बांधकामे दिवाळीपर्यंत थांबवा;मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश!

हवेची गुणवत्ता राखण्यासाठी स्यू मोटो दाखल

    06-Nov-2023
Total Views | 50
HC Directs Construction Halt Till Diwali

मुंबई
: गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात वायू प्रदूषण जोरावर असून सातत्याने हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. याची गंभीर नोंद मुंबई उच्च न्यायलयाने घेतली असून शहरातील सर्व बांधकामे दिवाळीपर्यंत थांबविण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच हवेची गुणवत्ता राखण्यासाठी दिवाळीत फटाके फोडण्यावरही वेळमर्यादा घालून द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

राजधानी दिल्ली पाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे. यामुळे श्वसनाच्या आजारांसह अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे. या वायू प्रदूषणाचा दृश्यमानतेवरही विपरीत परिणाम झाला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि.6 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने 12 नोव्हेंबर रोजी येणार्‍या दिवाळीपर्यंत शहरातील सर्व बांधकामे थांबविण्याचे निर्देशच न्यायालयाने सरकारला दिले.

न्यायालयाने म्हटले की, हा निर्णय वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी घेण्यात आला आहे. विकासकामांपेक्षा लोकांचे जीव अधिक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जर बांधकामे काही दिवस बंद राहिली तर काही आभाळ कोसळणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

तर मुंबईत बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवर बंदी

वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासह हवेची गुणवत्ता (एअर क्वालिटी इंडेक्स) सुधारण्यासाठी न्यायालयाने सरकारला गंभीर इशारा दिला आहे. न्यायालयाने सुचविलेले उपाय पुढील सुनावणीपर्यंत प्रभावी ठरले नाहीत, तर मुंबईतील बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा विचार करू, असे न्यायालयाने म्हटले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121