वसई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी वसई दौऱ्यावर येत आहेत. गडकरींच्या या दौऱ्याने वसई विरारच्या भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला आहे . गडकरींच्या या दौऱ्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून वसई विरार मधील अनेक प्रलंबीत आणि नवीन विकास कामांची मागणी करण्यात येणार आहे.
येत्या शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वसईत येत असून भाजप वसई विरार जिल्हा कार्यकारिणी मार्फत विरार पश्चिम येथील बालाजी बँक्वेट हॉल मध्ये सकाळी ११ वाजता गडकरी सोबत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्यक्रमात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन नाईक हे वसई विरार प्रदेशातील विविध प्रलंबीत कामे तसेच गरजेची नवीन विकास कामे यांची मागणी करणार आहेत .यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील डोकेदुखी ठरणारी वाढती वाहतूक समस्या , विरार ते नायगाव या रेल्वे स्थानकांदरम्यान प्रस्तावित ५ रेल्वे उड्डाण पूल , तसेच तालुक्यातील वेगवेगळ्या १२ जंक्शनवर अंदाजित ३९५ कोटी रुपये खर्चून १२ उड्डाण पूल, सेतू भारतम योजनेअंतर्गत बांधण्याची मागणी आहे.
त्याबद्दल मंत्री महोदय बरोबर चर्चा करून तालुक्यातील अनेक प्रलंबित विकासकामे यामध्ये रिंग रूट, भाईंदर ते नायगाव खाडीवर रेल्वेला समांतर पूल, MRVC योजनांतर्गत बोरिवली ते विरार दरम्यानचा ५ वा आणि ६ वा रेल्वे मार्ग, विरार, नालासोपारा, वसई व नायगाव रेलवे स्टेशनच्या मध्ये नवीन रेल्वे स्टेशन, तालुक्यातील शहरांना महामार्गा सोबत जोडणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, त्या ऐवजी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ५०० कोटीची विशेष निधी. तसेच तालुक्यातील सर्व प्रलंबित कामांसाठी निधी व नवीन विकासकामे मंजूर करण्याची मागणी आहे . या कामांमुळे तालुक्यातील नागरिकांना वाहतूककोंडीतून सुटका मिळेल आणि लोकलने प्रवास करणारे प्रवासी सुरक्षितपणे प्रवास करू शकतील.
याचबरोबर तालुक्यातील नागरिकांना कमी वेळात पालघरशी जोडणारा वैतरणा सागर संगमावरील म्हारंबल पाडा ते दातिवरे दरम्यान चा पूल , घोडबंदर चा गायमुख, ते नागला बंदर हा वसई खाडीवरील पूल व्हावा अशी ही मागणी करण्यात येईल . जेणेकरून वसईकर आणि ठाणेकरांना नवीन कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच आचोळे, गास, दिवाणमान येथील सुमारे १२०० एकर मिठागर जमिनीवर नवीन उद्योग उभारावेत अशीही मागणी भाजपा तर्फे करण्यात येईल. यामुळे वसई तालुक्यातील होतकरू तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील . अशा अनेक प्रलंबित व नवीन प्रकल्पाबाबत राजन नाईक हे नितीन गडकरी यांच्या कडे चर्चा करून वसई विरारच्या विकासाची मागणी करतील अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यानी माध्यमांना दिली आहे.