नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे चौथ्या गोवा सागरी परिषदेमध्ये बीजभाषण झाले. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी हवामान बदल, चाचेगिरी, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, अनिर्बंध मासेमारी आणि सागरी वाणिज्य स्वातंत्र्य यासारख्या सामायिक सागरी आव्हानांचा प्रभावी सामना करण्यासाठी हिंद महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय सहयोग चौकट स्थापन करण्याचे आवाहन केले आहे.
मुक्त आणि नियमाधारित सागरी कार्य करण्याला आपल्या सर्वांचे प्राधान्य आहे. ‘माझे तेच बरोबर’ या मताने काम करण्याला सागरी क्षेत्रात स्थान नाही. आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचे पालन करणे हेच आपल्यासाठी मार्गदर्शक असले पाहिजे. आपले संकुचित तात्कालिक हितसंबंध आपल्याला सुस्थापित आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन किंवा दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करू शकतात, परंतु असे केल्याने आपले सुसंस्कृत सागरी संबंध तुटतील. आपण सर्वांनीच संयुक्त सहकार्याने कायदेशीर सागरी नियमांचे पालन करण्यास वचनबद्ध केल्याशिवाय आपली समान सुरक्षा आणि समृद्धी जपली जाऊ शकत नाही. सहकार्याला चालना देण्यासाठी आणि कोणत्याही एका देशाने इतरांवर वर्चस्व गाजवू नये याची खात्री करण्यासाठी प्रतिबद्धतेचे वाजवी नियम महत्त्वाचे आहेत,” असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
समान सागरी प्राधान्यांचा विचार करताना, सागरी प्रदेशाची सुरक्षितता समृद्धता कमी करण्यासारख्या स्वार्थी हितसंबंध टाळून सर्वांचे सहकार्य असले पाहिजे; यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोर दिला. तसेच युएनसीएलओएस म्हणजेच ‘युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी’ - 1982 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचा आदर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.