मुंबई : जगभरातील सर्वांत स्मार्ट गाडी अशी बिरुदावली मिरवणार्या ‘टेस्ला’ कंपनीचा भारतीय बाजारपेठेमध्ये बहुप्रतीक्षित प्रवेश झाला असून मंगळवार, दि. १५ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टेस्ला’च्या भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे केले. अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांची ‘टेस्ला’ ही कंपनी इलेक्ट्रिक वाहननिर्मिती क्षेत्रातील एक अग्रण्य कंपनी. ‘टेस्ला’ची सुरुवात मार्टिन एबरहार्ड आणि मार्कटार्पेनिंग या दोन अभियंत्यांनी २००३ साली केली. स्पोटर्स वाहनांची आवड असलेल्या मार्टिनचे वेगवान आणि पर्यावरणपूरक वाहनांची निर्मिती करण्याचे स्वप्न होते. त्याच काळात मध्य-पूर्वेमध्ये असलेल्या अस्थिरतेमुळे पेट्रोलच्या किमती भडकल्या असल्याने पेट्रोलवर चालणारी वाहने खरेदी करणे मार्टिनला अयोग्य वाटले. त्यामुळेच ‘टेस्ला’च्या निर्मितीची कल्पना त्यांना सुचली.
या वाहननिर्मितीसाठी पूर्वानुभवामुळे दोघांनीही लिथियम आयर्न बॅटरीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांनाही या क्षेत्राचा अनुभव नसल्याने पुरवठादारही सहकार्य करण्यास राजी नव्हते. अखेरीस ‘लोट्स’सारख्या कंपन्यांच्या पाठिंब्यावर ‘टेस्ला मोटर्स’ची दि. १ जुलै २००३ रोजी रुजवात झाली.
२००४ मध्ये मस्क ६५ लाख डॉलर्सची गुंतवणूक करून ‘टेस्ला’चे अध्यक्ष झाले. त्यांची ‘रोडस्टार’ ही पहिली गाडी तयार करताना त्यांनी स्वतः आवश्यक ते बदल करून घेत, जुलै २००६ मध्ये या गाडीचा पहिला प्रोटोटाईप प्रसिद्ध केला. त्यानंतर अनेक मॉडेल्स त्यांनी बाजारात आणले. आजमितीला जवळपास ३५ देशांमध्ये ‘टेस्ला’ व्यापार करत आहे.
‘टेस्ला’ची वाढती मागणी
‘टेस्ला’च्या वाहनांना जगभर मागणी असून दिवसागणिक ही मागणी वाढत आहे. २०२४ मध्ये १७ लाख, ८९ हजार, २२६ ‘टेस्ला’च्या गाड्यांची जगभरामध्ये विक्री झाली. ‘टेस्ला’ची ब्रॅ्रण्ड व्हॅल्यू २०२४ मध्ये अंदाजे ५८.३ अब्ज डॉलर्स होती. मात्र, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केलेल्या खर्चामुळे ती २०२५ मध्ये ४३ अब्ज डॉलर्स असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘टेस्ला’च्या वाढत्या तक्रारी...
‘टेस्ला’च्या वाहन बांधणीमध्ये समस्या असून दरवाजांच्या अलायन्मेंटमध्ये अनेकदा बिघाड होतो. तसेच बांधणीच्या गुणवत्तेवरही तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
‘टेस्ला’च्या स्वयंचलित वाहनांमध्ये स्वतःहून ब्रेक लागणे, यंत्रणेत बिघाड अशा तक्रारीही अनेकदा चर्चेत होत्या.
तसेच गाडीच्या आतील वस्तूंचा दर्जा, ब्रेक, बॅटरी समस्या, गाडीचा रंग याबाबतही अनेकदा ग्राहकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.