सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवराजांचे नाव का येते?
25-Oct-2023
Total Views | 485
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या ‘सीबीआय’ चौकशीची फौजदारी स्वरूपाच्या जनहित याचिकेद्वारे मागणी करण्यात आली. या याचिकेवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात यावी, यासाठी आमदार आदित्य ठाकरेंनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कॅव्हेट दाखल केले. मात्र आता त्यामुळे आदित्य ठाकरेंच गोत्यात आलेत.
कारण ‘सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील आशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष रशीद खान पठाण यांच्यामार्फत सप्टेंबरमध्ये फौजदारी स्वरूपाची जनहित याचिका दाखल करण्यात आली. तसेच, सुशांत आणि दिशा यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी ठाकरे यांना तत्काळ अटक करण्याची आणि त्यांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती. ही याचिका अद्याप सुनावणीसाठी आलेली नाही. या प्रकरणी याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी गटाचे आमदार आदित्य ठाकरेंना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. उच्च न्यायालयातील शपथपत्रांमध्ये खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, याचिकाकर्ते आणि साक्षीदारांकडून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात केस दाखल करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळे सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव का येते? सुशांतसिंह आणि दिशा आत्महत्या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचे कनेक्शन काय आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
सुशांतसिंह राजपूत यांचा मृतदेह १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या घरामध्ये आढळला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली असताना, सुशांत याच्या वडिलांनी त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. तसेच, बिहार पोलिसांत तक्रार दाखल केली. नंतर, हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. याशिवाय, रिया ही अंमलीपदार्थाचे सेवन करत होती आणि तिने ते सुशांतलाही दिल्याच्या आरोपांचा केंद्रीय अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग तपास करतेय. दुसरीकडे, दिशा सालियान हिचा ९ जून २०२० रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला . मुंबई पोलिसांनी या प्रकरणीही अपघाती मृत्यूची नोंद केली होती.
मात्र काही दिवसांनी दिशा हिची हत्या झाली असून आदित्य ठाकरेंचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला. त्यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. तसेच काही दिवसापुर्वी विधानसभा अधिवेशनामुळे ही सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत आलं. कारण शिवसेना आमदार भरत गोगावले आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आरोप केला होता की, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला AU नावाने ४४ वेळा कॉल आला होता. राहुल शेवाळे यांनी बिहार पोलिसांच्या म्हणण्यानुसार AU म्हणजे आदित्य आणि उद्धव ठाकरे असा दावा केला होता.
तसेच त्यावेळी विधानभवनाच्या आवारात भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी 'AU कोण आहे' असे बॅनर घेऊन निदर्शने केली. त्याचबरोबर सुशांतसिंह राजपूत आणि त्यांची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट व्हायला हवी, असे नितेश राणे यांनी सांगितले होते. त्याचबरोबर सुशांतसिंह आणि दिशा सालियन प्रकरणात अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे दसऱ्यानंतर देश सोडून जाऊ शकतात, असे नितेश राणे यांनी विधान केलयं.दरम्यान सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे ८ जून २०२० रोजी मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण हे सगळे १०० मीटरच्या परिसरात एकत्र होते. १३-१४ जून २०२० रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणं झाले याची चौकशी व्हावी,अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
त्यामुळे आदित्य ठाकरेंचा दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येशी संबध जोडला जात असताना, दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा त्या भागात आदित्य ठाकरेंचे मोबईल लोकेशन होते? असा सवाल रशीद खान पठाण यांनी उपस्थित केला आहे. तसेच हत्या आणि आत्महत्या नव्हती तर आदित्य ठाकरेंनी कॅव्हेट का दाखल केली? ८ जूनला काय झाले? दोनवेळा तपास अधिकारी का बदलला? Cctv का गायब झाले? visitor book चे त्या 2 दिवसांचे पान का फाडले गेले? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत." सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या एक आठवडा आधी ते कोणासोबत फोनवर बोलले हे जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञ किंवा सुशांतचा फोन डेटा का नाही?आदित्य ठाकरेंवर थेट कुणीही नाव घेऊन आरोप केले नव्हते. पण सुरुवातीलाच शिवसेनेचे नेते अनिल परब आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी समोर येऊन आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे स्वत:हून शिवसेनेने स्पष्टीकरण का दिले?"पार्टीमध्ये आदित्य ठाकरे होते का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मग उबाठा गटाचे आदित्य ठाकरे पार्टीला होते की नव्हते याचा खुलासा का करत नाहीत? AU म्हणजे काय? रियाच्या फोनवर आलेले AU नावाचे फोन आदित्य ठाकरेंचेच होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसेच रिया चक्रवर्ती सांगत असल्याप्रमाणे AU म्हणजे आदित्य ठाकरे नाही, अनन्या उधास आहे तर ती अद्याप स्वता : हून समोर का आलेली नाही? , असे बरेच प्रश्न उपस्थित होते आहेत. आणि या सर्व प्रश्नांमुळेच आदित्य ठाकरेंचे नाव दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वारंवार येत आहे.