मुंबई : कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सरकारवर सतत ताशेरे ओढण्याचे काम सुरू होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचीच पोलखोल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात कंत्राटी शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली. हे संपूर्ण पाप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा सरकारचं आहे. कंत्राटी शिक्षक भरतीवर बोलताना यांना लाजा कशा वाटत नाहीत. असा हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतला. शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना ३ जीआर निघाले. त्यात शिक्षकपदापासून विविध पदांवर कंत्राटावर लोकांना घ्यायची तरतूद करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचे जीआर निघाले होते. राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना त्या सरकारने फॅसिलिटी मॅनेजरचा टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. यास मान्यता उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यावर त्यांची सही आहे."
"जेव्हा आमचं सरकार आलं, आमच्या कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव आला तेव्हा मीच सांगितलं याचे रेट कमी करा. २५ ते ३० टक्के रेट जास्त आहेत, त्यामुळे हे रेट कमी केले पाहिजे, असं मी म्हटलं. त्यानंतर २५ ते ३० टक्के रेट कमी केला. मी विधानसभेतही सांगितलं आहे, हे कंत्राटी भरतीचं पाप आमचं नाही. हे पाप त्यांचं आहे. आणि मी आमच्या मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मागच्या सरकारचं धोरण आम्ही धोरण म्हणून का स्वीकारावं? त्यामुळे हा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे." असं फडणवीसांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात १८ हजार पोलिसांची भरती कधीच झाली नव्हती. ती आम्ही केली आहे. आज यांचा चेहरा उघडा पाडला आहे. अनेक विषय आहेत. ही अंतिम पत्रकार परिषद नाही. अनेक विषयात यांना मी उघडं पाडणार आहे. यांच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे. असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.