पुणे : “देशातील निवडणुकांत अनेकांचे गड उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे अमेठीप्रमाणे एक दिवस बारामतीदेखील उद्ध्वस्त होईल, यात काही नवे नाही. निवडणुका या जिंकण्यासाठीच लढायच्या असतात,” असे सांगून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी बारामती येथे येत्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष ४५हून अधिक जागा राज्यात जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या प्रभारी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या आगामी बारामती भेटीच्या पार्श्वभूमीवर ते येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बावनकुळे यांच्यासमवेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. राहुल कुल, आ. गोपीचंद पडळकर, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश काळे, दिलीप खैरे, पांडुरंग कचरे यासह स्थानिक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
“पक्षाचे संघटन मजबूत होते तेव्हा संघर्ष निर्माण करण्याची ताकद येते. त्यावेळी चांगले-चांगले गड उद्ध्वस्त होतात. कोणाचा गड कधीच कोणासाठी कायम राहत नाही,” असेही त्यांनी अमेठीचे उदाहरण देऊन सांगितले. आगामी निवडणुकांसाठी भाजपचे लक्ष्य ४०० + आणि बारामतीसह राज्यातील सर्व लोकसभा जिंकण्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे, त्यामुळे कधी झाली नव्हती, अशी लढत २०२४ मध्ये बारामतीमध्ये होईल, असेही ते म्हणाले.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास पाहिला, तर आठ जागांच्या वर हा पक्ष गेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे विश्वगुरू म्हणून ओळखले जातात. जगातील १५५ देशांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. मजबूत भारत बनविण्याचे ’व्हिजन’ त्यांच्याकडे आहे. विरोधकांकडे फक्त राजकीय ‘व्हिजन’ आहे. त्यांना आपली दुकाने चालवयाची आहेत, असा टोलादेखील बावनकुळे यांनी लगावला.
काटेवाडी येथून त्यांनी आपल्या भेटीची सुरुवात केली. यावर ते म्हणाले की, “प्रत्येक बूथवर संघटनात्मक ताकद मिळावी, यासाठी काटेवाडीत जात आहे. दिवसभरात अनेकांना भेटणार असून, जनतेची निवेदने स्वीकारुन ती सरकारकडे पाठविणार आहे. बारामती मतदार संघात अजूनही देशात अनेक गड उद्ध्वस्त झालेत, बारामतीही होईल! ४५ टक्के जनता उपेक्षित आहे. धनगर, ओबीसी, मराठा समाजाचे विविध प्रश्न आहेत. चार-दोन लोक मोठे झाल्याने समाज मोठा होत नाही. उपेक्षित लोक एकत्रित झाल्यावर संघर्ष निर्माण होतो आणि हा संघर्ष विजयापर्यंत घेऊन जातो. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
अशी असेल बारामतीची व्यूहरचना
“बारामतीमध्ये संघटना वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता एक हजार कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल. भविष्यात अनेक मोठे प्रवेश होतील,” असे चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी असून, पुढील दीड वर्षांत पाच ते सहा वेळा प्रत्येकी तीन दिवसांचे दौरे होतील. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना त्या येथपर्यंत पोहोचवतील,” असेही त्यांनी सांगितले. “या बळावरच आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत,” असे ते म्हणाले.