उद्धव किंवा शिंदे नव्हे राज ठाकरे घेणार दसरा मेळावा!

संदीप देशपांडेंचं राज ठाकरेंना पत्र!

    02-Sep-2022
Total Views |

eknath
 
मुंबई : शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यासाठी चढाओढ सुरू असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेही मेळावा घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंकडे याबद्दल पत्र लिहीले आहे. देशपांडेंनी यावेळी ठाकरे गटासह एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केले आहे. राज्यातील तमाम शिवसैनिक गोंधळात असताना शिवसेना या शब्दावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे शब्द ऐकायचे आहेत, अशी भावनिक साद त्यांनी राज यांना पत्राद्वारे घातली आहे.
 
  
देशपांडे आपल्या पत्रात म्हणतात, "आदरणीय साहेब, सविनय जय महाराष्ट्र! वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे आपल्या महाराष्ट्रातील केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक समीकरणही होते. सलग चार दशकांहून अधिक काळ 'एक वक्ता, एक मैदान आणि लक्ष लक्ष श्रोते' हा चमत्कार अवघ्या जगात कुठे पहायला मिळाला असेल तर तो इथेच, आपल्या शिवतीर्थावर! दसऱ्याच्या दिवशी मराठीजनांच्या रांगाच्या रांगा ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत शिवतीर्थावर येत आणि हिंदुहृदसम्राटांकडून मिळालेलं राष्ट्रभक्ती आणि महाराष्ट्र धर्माचं 'बाळकडू'- विचारांचं सोनं घेऊन घरी परतत.""दुर्दैवाने, वडिलोपार्जित वास्तूत राहतो इतक्याच पुण्याईवर स्वतःला हिंदुहृदसम्राटांचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालाच तिलांजली दिली.
 
 
 
 
ज्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांवर प्रबोधनकार आणि हिंदुहृदयसम्राटांनी संपूर्ण हयातभर लेखणी, कुंचला आणि वाणीने आसूड ओढले, त्याच राष्ट्रद्रोही- धर्मद्रोही पक्षांशी आघाडी करून हिंदुत्वाच्या विचारांवर मतदान करणाऱ्या लक्षावधी शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! बरं, इतकं सगळं करूनही स्वत:चा राजकीय पक्ष आणि सरकार या वारसदारांना सांभाळता आलं नाहीच.", अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
 
 
 
"एरवी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं असतं. पण आता "कै. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार" असं म्हणत 'यू टर्न' आणि 'बंडखोर' असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगतं ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही! ज्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील मराठी भूमिपुत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टा-मस्करीचा विषय ठरत आहे, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?", असा प्रश्न त्यांनी शिंदे गटालाही विचारला आहे.
"वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे आणि शि व से ना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे.
 
 
 
त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण - हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे.", असे आवाहन त्यांनी राज ठाकरेंना केले आहे.
 
 
  
"दसऱ्यानिमित्त शिवतीर्थावर आपल्या परखड, रोखठोक 'ठाकरी' शैलीतील वक्तृत्वाच्या तेज:पुंज आविष्काराची - "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..." या हाकेची महाराष्ट्र आणि अवघा हिंदुस्थान आतुरतेने वाट पहात आहेत. धन्यवाद! आपला नम्र, महाराष्ट्र सैनिक", असे म्हणत त्यांनी ही विनंती केली आहे. दसरा मेळावा कुणी घ्यावा, असा वाद सध्या शिवसेनेत सुरू आहे. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या गटाला आपणच दसरा मेळावा घेणार आणि तो शीवतीर्थावरच होईल, असे निर्देश दिले आहेत.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121