मुंबई : वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. ठाकरे पिता - पुत्र आणि त्यांचे कार्यकर्ते सत्ताधारी फडणवीस - शिंदे सरकारवर टीका करण्यासाठी धडपडत असताना, हा प्रकल्प महाराष्ट्रातून निघून जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच कसे जबाबदार आहे याचे पुरावेच भाजप कडून सादर केले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी तर चक्क दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाबद्दल काय वक्तव्ये केली होती, तीच आपल्या ट्विट मध्ये पोस्ट करत, आदित्य ठाकरेंच्या पेंग्विनसेनेचा खोटारडेपणा उघडकीस आणला आहे.
तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार नाही असे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी ही कंपनी कशी महाराष्ट्राला नुकसानकारक अटी घालतेय, त्यामुळे हा प्रकल्प आला तर राज्याचे नुकसानच होईल अशा प्रकारची विधाने केली होती. वास्तविक हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी २०१५ साली तत्कालीन फडणवीस सरकारने खूप प्रयत्न केले होते. तेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रातच होणार अशी चिन्हे दिसायला लागली होती. पण २०१९ साली फडणवीसांच्या नेतृत्वाखालचे भाजप - शिवसेना युतीचे सरकार जाऊन, महाविकास आघाडी अस्तित्वात आली.
या सरकारच्या काळात फॉक्सकॉन कंपनीला फडणवीस सरकारने देऊ केलेल्या सर्वच सुविधा आणि सवलती नाकारण्यात आल्या. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन सुद्धा काहीच निकाल लागला नाही. शेवटी महाराष्ट्र सरकारच्या ढिसाळ कारभाराने कंटाळून जाऊन फॉक्सकॉन कंपनीने गुजरात सरकारने दिलेला प्रस्ताव स्वीकारला आणि आता तो प्रकल्प गुजरातलाच होणार हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला हेही आता स्पष्ट झाले आहे.