उपाय अगदी सोपा आहे. पावसाळ्यासाठी पूर्वतयारी करा. काही पथ्ये पाळा व पावसाळ्यातील कुठल्याही सर्दी, खोकला व तापासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या.
पावसाळा आणि आजार यांचा जवळचा संबंध आहे. पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच असते. परंतु, हे भिजणे काहीजणांना बाधतेदेखील. पावसाळ्यात ‘पिकनिक’, ‘रेन-डान्स’ ही नवीन संस्कृती उदयास आली आहे. त्याचबरोबर ‘मलेरिया’, ‘डेंग्यू’, ‘लेप्टोस्पायरोसीस’, ‘स्वाईन फ्लू’, ‘बर्ड फ्लू’ इत्यादी रोगांची गुंतागुंत काही रुग्णांमध्ये प्राणघातक ठरताना दिसते.
‘सोलोमन ग्रॅण्डी बॉर्न ऑन मंडे’ अशी एक कविता आमच्या लहानपणी होती. ‘सोलोमन’चा जन्म सोमवारी होऊन, रविवारपर्यंत त्याचा दफनविधी होतो. अशा आशयाचे ते बालगीत होते. प्रसिद्ध फिजिशियन डॉ. राममूर्ती आपल्या व्याख्यानात ‘मलेरिया’बद्दल सांगायचे, “हल्ली ‘फालसिपॅरम मलेरिया’ हा वेगाने बळावणारा आजार ठरू पाहत आहे. सकाळी रुग्णाला थंडी भरून ताप येतो. दुपारी आजार बळावतो व संध्याकाळी रुग्ण दगावतो.” शनिवारी पाहिलेला तापाचा रुग्ण आपल्याला सोमवारी पुन्हा दिसेल की नाही, अशी शंकेची पाल हल्ली बर्याच डॉक्टरांच्या मनात चुकचुकते. याला कारण ‘फालसिपॅरम मलेरिया’ रोगाची झपाट्याने होणारी गुंतागुंत हे डॉ. राममूर्तींचे शब्द आजही आठवतात. हीच गोष्ट डेंग्यू, ‘लेप्टोस्पायरोसिस’, ‘स्वाईन फ्लू’, ‘बर्ड फ्लू’, ‘टायफाईड’, ‘कॉलरा’, ‘कावीळ’, ‘मेनिन जायटीस’ या इतर साथीच्या रोगांबाबत लागू आहे.
कोरोना महामारीने सर्व साथीच्या रोगाची परिभाषाच बदलली. कोरोनाचा ताप म्हणजे, मृत्यूची चाहूल अशी दहशत या आजाराने निर्माण केली होती.
पावसाळ्यात जसे रस्त्यावर खड्डे पडणे अपरिहार्य आहे, तसेच साथीच्या रोगाचे प्रमाण वाढणेदेखील अपरिहार्य आहे. शहरी संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. पाणी उकळून प्या, अशी सूचना आरोग्य विभागातर्फे करण्यात येते. ‘वॉटर प्युरिफायर’, ‘झिरो बी’ इत्यादी पाणी शुद्धीकरणाचे घरगुती उपाय उपलब्ध आहेत, तरीदेखील कावीळ, उलट्या, जुलाब, ‘टायफॉईड’, ‘कॉलरा’ यासारखे पाण्यावाटे पसरणारे आजार पावसाळ्यात जास्त प्रमाणात आढळतात. रुग्णाची प्रतिकारशक्ती जर चांगली असेल, तर विशेष गुंतागुंत न होता, हे आजार औषधाने बरे होतात. प्रतिकारशक्ती कमी असल्यास त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजाराच्या गुंतागुंतीचे प्रमाण जास्त होते व यातील काही रुग्णांना रुग्णालय गाठावे लागते.
हल्ली आजाराच्या चाचण्या, औषधे अत्यंत महागडी झाली आहेत. महागडी औषधे व महागडे रुग्णालय म्हणजे योग्य उपचारांची खात्री असा गैरसमज समाजात बळावत चालला आहे. आज खरी गरज आहे, ती व्यवस्थित रोग निदान करणार्या डॉक्टर्सची.
पाण्यावाटे पसरणार्या आजाराबरोबरच ‘कोविड’, ‘मलेरिया’, ‘डेंग्यू’, ‘लेप्टोस्पायरोसिस’, ‘स्वाईन फ्लू’ हेदेखील थैमान घालत असतात. या आजाराची वैशिष्ट्ये म्हणजे निदान करण्यात येणार्या अडचणी.
मलेरियाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली, म्हणजे रुग्णाला मलेरिया नाही, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. ‘डेंग्यू’, ‘लेप्टोस्पायरोसिस’, ‘स्वाईन फ्लू’ यांच्या चाचण्या महागड्या आहेत व त्या प्रत्येक तापाच्या रुग्णासाठी करून घेणे व्यावहारिक नाही. यासाठी डॉक्टरांचा अनुभव व अंतर्मनाचा आवाज महत्त्वाचा आहे. ‘टॉक्सिक लूक ऑर सिक लूक ऑफ पेशंट’ या वाक्प्रचाराचा वापर वैद्यकीयशास्त्रात बर्याच वेळा केला जातो.
याचे वर्णन शब्दांत करता येत नाही. ते प्रत्येक डॉक्टर आपल्या अनुभवाने शिकतो. ‘सीबीसी’, ‘ईएसआर’, ‘एमपी’, ‘विडाल’, ‘युरिन’ या प्राथमिक चाचण्यातून बर्याचशा रुग्णांच्या तापाचे निदान होऊ शकते. पांढर्या पेशी, ‘प्लेटलेट्स’, तांबड्या पेशी अतिशय कमी झाल्या असल्यास मोठ्या आजारांचा संशय बळावतो व महागड्या चाचण्या करण्याची गरज पडते. या सर्व आजारांबरोबर अस्थमा व न्यूमोनिया या आजारांमध्ये पावसाळ्यात लक्षणीय वाढ होते. थोडा जरी संशय आल्यास छातीचा ‘एक्स-रे’ काढणे जरुरी आहे. कारण, त्याने पुढचे मोठे संकट टाळता येते. ‘नेब्युलायझर’ची सोय असल्यास अस्थमाच्या अनेक रुग्णांचे रुग्णालयामध्ये भरती होणे टाळता येते.
पावसाळ्यात रुग्णच फक्त आजारी पडत नाहीत, तर डॉक्टर्सदेखील आजारी पडतात. आमचे एक मित्र ‘कॉर्पोरेट हॉस्पिटल’मध्ये 15 दिवस ‘व्हेंटिलेटर’वर होते. मृत्यूशी यशस्वी झुंज देऊन, ते घरी परत आले. परंतु, हॉस्पिटलचे बिल बघून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली.
या सर्वावर उपाय काय?
उपाय अगदी सोपा आहे. पावसाळ्यासाठी पूर्वतयारी करा. काही पथ्ये पाळा व पावसाळ्यातील कुठल्याही सर्दी, खोकला व तापासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या.
पावसाळ्याची पूर्वतयारी
1. घरातील लहान मुलांचे लसीकरण झाले आहे की नाही, हे तपासून बघणे.
2. घरातील मोठ्या माणसांसाठीदेखील ‘हिपॅटायटीस ए’, ‘बी’, ‘कॉलरा’, ‘टायफॉईड’, ‘स्वाईन फ्लू’ इत्यादी लसी घेतल्या गेल्या की नाही, ते बघणे.
3. घराभोवती पाण्याचे डबके साचणार नाही, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, यासाठी लागणारी डागडुजी करणे.
पावसाळ्यातील पथ्ये
1. पावसाळ्यात पाणी गढूळ येते. पाणी गाळून, उकळून प्यावे, ‘वॉटर प्युरिफायर’व्यतिरिक्त पाणी उकळलेले असल्यास सुरक्षा आणखी वाढते.
2. शाळेतल्या मुलांनी पाण्याची बाटली घरून न्यावी. बाहेरचे पाणी शक्यतो टाळावे. उघड्यावरील पदार्थ, हॉटेलमधील खाणे शक्यतो टाळावे. अगदी गटारीदेखील घरी साजरी करावी.
3. मांसाहार, मसालेदार पदार्थ, वातजन्य पदार्थ पावसाळ्यात टाळावे.
पावसाळ्यातील आजार
1. सर्दी, पडसे, खोकला, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे पावसाळ्यात स्वत:च्या अनुभवाने बरे करण्याच्या फंदात पडू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घ्यावीत. एका रुग्णासाठी आणलेले औषध आपल्या बुद्धीने दुसर्या रुग्णास देऊ नये.
2. हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ आली, तर आरोग्य विम्याचे पाठबळ असल्याशिवाय महागड्या हॉस्पिटलची पायरी चढू नये.
डॉ. मिलिंद शेजवळ