ठाणे: वसई-विरार मनपा आणि पालघर पट्ट्यातील विविध नगर पंचायतींमधील नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेला ठाणे आणि पालघर पट्ट्यात मोठा फटका बसला आहे. शनिवारी समाविष्ट झालेल्या नगरसेवकांमध्ये वसई-विरार मनपातील पाच नगरसेवक, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९, तलासरी नगर पंचायत समितीतील पाच, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांसह पालघरच्या पाच जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. शिंदेंचे शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे झालेल्या कार्यक्रमात शिंदेंच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्यासोबत वसई तालुका आणि बोईसरमधील प्रमुख पदाधिकारी, तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे आणि बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संख्ये, मोखाडा तालुकाप्रमुख अमोल पाटील, जि. प. सदस्य प्रकाश निकम आणि वसई-विरार मनपाचे स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी, पालघर जिल्हा परिषद कृषी सभापती सुशील चुरी यांनीही शिंदेंना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची ठाणे ग्रामीण भागातील ताकद वाढली आहे. यावेळी बोलताना शिंदेंनी वसई-विरार आणि पालघर पट्ट्यातील या नगरसेवकांना त्यांच्या विभागात काम करण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच प्रत्येक गावातील प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करू, असेही सांगितले. यावेळी खा. राजेंद्र गावित, आ. रवींद्र फाटक, माजी जिल्हाप्रमुख राजेश शहा, आ. श्रीनिवास वनगा आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे आदी उपस्थित होते.
रवींद्र फाटक यांची पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी पुनर्नियुक्ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांची हकालपट्टी बेकायदेशीर ठरवून त्यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदावर पुनर्नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी आ. रवींद्र फाटक यांचीदेखील पालघर जिल्हा संपर्कप्रमुख पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० नगरसेवकांच्या गटाने शिंदेंना पाठींबा दिला, त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी रवींद्र फाटक हेच पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राहतील, असे सांगितले.