ठाणे: संततधार पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यावरील बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले असून प्रशासनाच्या रस्ते डागडुजीवर पाणी फेरले आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूल ते तीनहात नाका आणि भिवंडी व मुंब्रा बायपास, घोडबंदर रोड तसेच भिवंडी येथील कशेळी टोलनाका ते नारपोली, कळवा भागातील रस्त्यांनी वाहनांची वाट अडवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणार्या पावसामुळे ठाणे शहरातील तसेच ठाणे हद्दीबाहेरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे ठाणेकरांना दररोज प्रचंड वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे महापालिका हद्दीमध्ये सेवा रस्ते आणि अंतर्गत रस्ते हे ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येत असून घोडबंदर येथील रस्ते ‘एमएमआरडीए’च्या अखत्यारित येतात. दुसरीकडे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितदेखील काही रस्ते येतात. पावसाने जोर पकडल्याने सर्वच प्राधिकरणाच्या रस्त्यांवर बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. परिणामी, मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. सततच्या पडणार्या पावसामुळे खड्डे बुजवण्यात व्यत्यय येत असल्याने प्रशासनाची त्रेधातिरपिट उडत आहे.
दरम्यान, सोमवारी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी वाहतूक पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन वाहतूक कोंडीबाबत निर्देश दिले.
कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची नागरिकांची मागणी
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील रस्त्यांपेक्षा २७ गावांतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. कल्याणच्या टिळक चौकात चार दिवसांपूर्वीच दोन वृद्ध खड्ड्यात पडून जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यासाठी लाखो रुपये खर्च त्यांच्या कुटुंबीयांना करावा लागला. ही परिस्थिती अन्य नागरिकांच्या बाबतीत घडू शकते. शालेय वाहतूक करणार्या वाहनांनाही खड्ड्यांचा फटका बसत आहे. मात्र, भर पावसात खड्डे बुजविणार कसे, अशी कारणे महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहेत.