व्रत पर्यावरण रक्षणाचे

    13-Jun-2022
Total Views | 92
 
vs
 
 
वटपौर्णिमा म्हणजेच वटसावित्री व्रत. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या व्रतासाठी नेमके वडाचेच झाड का निवडले जाते? वडाचे झाड आपल्या अनंत पारंब्या घेऊन वर्षानुवर्षे स्थितप्रज्ञ असते. या वडाच्या झाडाची महती सांगणारा हा लेख...
 
 
नेपाळ, उत्तर भारत आणि महाराष्ट्र, गोवा, गुजरात या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा हा हिंदू उत्सव म्हणजे वटपौर्णिमा. हिंदू पंचांगामधील ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेलाविवाहित स्त्रिया त्यांच्या पतीवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून वडाच्या झाडाभोवती एक औपचारिक धागा बांधून व वडाचे पूजन करून साजरी करतात. या वर्षी वटपौर्णिमा, १४ जून रोजी येत आहे. हा उत्सव महाभारतात सांगितल्याप्रमाणे सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे. चला, तर मग आधी ही कथा एकदा बघूया काय आहे आणि मग या विलक्षण झाडबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया.
 
 
महाभारताच्या काळातल्या राजा अश्वपतीला संतती नव्हती. शेवटी सवितृ देवता त्यांना प्रसन्न झाली आणि त्यांना सांगितले की, लवकरच तुम्हाला मुलगी होईल. अपत्यप्राप्तीमुळे राजाला खूप आनंदी झाला. देवाच्या वरदानाने या मुलीचा जन्म झाला म्हणून मुलीचे नाव ‘सावित्री’ ठेवले गेले.
 
 
सावित्री इतकी सुंदर आणि पवित्र होती की, तिच्या गावातील सर्व पुरुष तिच्याशी बोलायला घाबरायचे व कुणीही तिच्याशी विवाह करण्यास तयार नव्हते. हतबल होऊन अश्वपती राजाने तिला स्वतः नवरा शोधायला सांगितले. नवर्‍याच्या शोधात, सावित्री जंगलात निघाली व तिची भेट वनात राहणार्‍या द्युमतसेन नावाच्या आंधळ्या राजाच्या मुलाशी झाली. हा होता सत्यवान. सावित्रीने पती म्हणून सत्यवान ला निवडते.
 
 
परत राजवाड्यात आल्यावर मात्र सावित्री तिच्या वडिलांना नारद मुनींशी बोलताना पाहते. ते राजाला सांगत होते की, जरी सगळं ठीक असले तरी सावित्रीची ही निवड चुकली आहे. कारण, एक वर्षाने सत्यवानाचा मृत्यू होणार हे दैवलिखित आहे. तरीही सावित्रीने पुढे जाण्याचा आग्रह धरला आणि तिचे सत्यवानाशी लग्न झाले.
 
 
सत्यवानाच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी, सावित्रीने व्रत आणि उपवास करण्याचा निश्चय केला. राजा द्युमतसेन अर्थात सत्यवानाचे वडील तिला सांगत होते की, हा व्यर्थ प्रयत्न तिने सोडून द्यावा, पण सावित्रीने शपथ घेतली होती. दररोजप्रमाणेच त्याच्या मृत्यूच्या दिवशीही सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला. पण सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढताच त्याला अशक्त वाटू लागले. मग सावित्रीने सत्यवानाचे मस्तक आपल्या मांडीवर ठेवले. पण सत्यवानाचे प्राण गेले होते. तेव्हा यमराज तेथे आले आणि सत्यवानाच्या आत्म्यास घेऊन जाऊ लागले. सावित्रीने सत्यवानाचे शरीर वटवृक्षाच्या सावलीत ठेवले व ती आपल्या सामर्थ्याने यमाच्या मागे जाऊ लागली.
 
 
यमराजाने समजावण्याचा प्रयत्न केला, तिला अडवलेदेखील, पण सावित्रीला हे काहीच मान्य नव्हते. ती म्हणाली, माझे पती जिथे जातील, मी पण तिथे जाणार. सावित्रीची निष्ठा आणि भक्ती पाहून यमराज म्हणाले, “हे देवी तू धन्य आहेस.” सत्यवानाला सोडून यमराजांनी सावित्रीला तीन वरदान मागायला सांगितले.
 
 
या परिस्थितीतदेखील सावित्रीने विवेक सोडला नाही. पहिल्या वरदानात सावित्रीने आपल्या अंध सासर्‍याला दृष्टी मागितली. पुढल्या वरदानात वनवासी पती व सासर्‍यासाठी राज्य मागितले. यमराजाने या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. तिसर्‍या वरदानात, सावित्रीने १०० पुत्र व सौभाग्य मागितले. यमदेवानेदेेखील जास्त विचार न करता, ‘तथास्तु’ म्हणून टाकले. नंतर त्याला सावित्री म्हणाली, “प्रभू, मी एक सत्गुणी, पतिव्रता पत्नी आहे आणि तुम्ही मला पुत्रवती होण्याचे वरदान दिले आहे.” यमदेवाकडे पर्याय उरला नव्हता आणि त्याला सत्यवानाला पुनर्जीवित करावेच लागले. सावित्रीच्या बुद्धिचातुर्याची स्तुती करून इच्छित वर देऊन यमराज अंतर्धान पावले.
 
 
इथे सासर्‍यास दृष्टी मिळाली व राज्यदेखील मिळाले. सत्यवान वटवृक्षाच्या झाडाखाली जीवंत बसला होता. तेव्हापासून वटसावित्रीला वटवृक्षाची पूजा करून सत्यवान-सावित्रीची कथा ऐकण्याचा नियम आहे. या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात. कौटुंबिक जीवन आनंदी होते आणि मुले जन्माला येतात. त्यामुळे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात वट सावित्री व्रत पाळतात आणि ही कथा ऐकतात.
 
 
तर वाचकांनो, कथा उत्तम आहेच पण, मला तुमचे लक्ष काही गोष्टींकडे वळवायचे आहे. या कथेतील एक महत्त्वाची घटना बघूया? सावित्रीने सत्यवानाचे शरीर वडाच्याच झाडाखाली का ठेवले असेल? हा निव्वळ योगायोग असेल का? का आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथेप्रमाणे या कथेतदेखील काही वैज्ञानिक तर्क दडलेले असतील? वडाचेच झाड या व्रतासाठी का निवडलेले असेल?
 
 
वटवृक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या हिंदू त्रिमूर्तीला मूर्त रूप देतो, असे मानले जाते. म्हणून स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि झाडाच्या खोडाभोवती पवित्र धागा बांधून देव आणि वटवृक्षाची पूजा करतात. हे विलक्षण झाड आहे, यात वाद नाही. या झाडास ‘अक्षयवट’ असेदेखील म्हटले जाते. ऋळर्लीी लशपसहरश्रशपीळी अर्थात वटवृक्ष या झाडाला पारंब्या येतात, ज्या हवाईमुळे म्हणून वाढतात आणि जमिनीपर्यंत पोहोचतात. एकदा ही मुळे जमिनीवर पोहोचली की, ती वृक्षाच्छादित खोडात वाढतात, म्हणून त्याला ‘बहुपाद’ असेही म्हणतात, ज्याला अनेक पाय असतात. हे दीर्घायुष्याचे प्रतीक आहे आणि दैवी निर्माता ब्रह्माचे प्रतिनिधित्व करते. पुराणानुसार, प्रलयानंतर हे एकमेव झाड असेल जे पृथ्वीवर राहील, म्हणून त्याला ’अक्षयवट’ म्हणतात. त्यामुळे आपला वंश दीर्घकाळ टिकावा, यासाठी वृक्षाची पूजा केली जाते.
 
 
आता वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर या झाडाचे अनंत उपयोग आहेत, जे विज्ञानाने पुराव्यानिशी सिद्ध केलेले आहेत. हे झाड व त्याच्या अवयवांचे अर्क, कर्करोगविरोधी, विषाणूविरोधी आहे. तसेच मधुमेहावर उपचार आणि मलेरियाविरुद्धदेखील यापासून औषधे बनवली जातात. झाड ‘कार्डिओप्रोटेक्टिव्ह’ (हृदय संरक्षक) यकृतासाठी संरक्षणात्मक आणि ‘न्यूरोप्रोटेक्टिव्ह’ प्रभावदेखील दाखवते. आयुर्वेदिकऔषधी पद्धतीनुसार झाडाचे साल, फळे आणि हवाईमुळे मधुमेह बरा करण्यासाठी वापरली जातात.इतकेच नाही तर त्वचेचे विविध विकार आणि व्रण बरे करण्यासाठी सालाचा उपयोग होतो. साल जळजळ, सूज उतरवणे इ. मध्ये मलम म्हणून वापरले जाते. दमा, मूळव्याध, गोनोरिया, हिमोप्टिसिस आणि लघवीचे विकार बरे करण्यासाठीदेखील हे झाड प्रभावी आहे, असे संशोधन सांगते. वडाच्या पानांचा, कळ्या आणि मुळांचा काढा मधात मिसळून त्याचा वापर उलट्या आणि इतर पोटाच्या विकरांच्या उपचारासाठी केला जातो. पानांचा उपयोग अल्सर, कुष्ठरोग, जळजळ, त्वचेची अ‍ॅलर्जी आणि फोडांवर होतो. कळ्या जुलाब आणि आमांशच्या उपचारासाठी वापरतात. तसेच झाडाच्या चीकाचा उपयोग मज्जातंतुवेदना, संधिवात, मूळव्याध, प्रमेह इ. मध्ये केला जातो. वटांकुर विविध स्त्री-रोगांसाठी उत्तम उपाय आहे, हेदेखील वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला आहे. इतकेच काय, वडाच्या झाडच्या खोडाचा व पानांचा लेप जखमा बर्‍या करण्यासाठीचे उत्तम औषध आहे. केसांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून वटवृक्ष उपयोगी आहे.
 
 
आता तुम्ही विचार करा, इतके सगळे शास्त्रोक्त पद्धतीने, आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेले आहे व असे असताना, सावित्रीने सत्यवानाचे मृत शरीर ठेवायला वडाचेच झाड निवडले हा निव्वळ योगायोग असावा का? का, पुराण आणि दंतकथा माध्यमातून आपल्या पूर्वजांनी या झाडाचे औषधी उपयोग अधोरेखित केले आहेत? आपल्या इतिहासात असे कथेमधून ज्ञान पुढच्या पिढीला देणे काही नवे नाही. विचार करा...
 
 
 - मयुरेश जोशी
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121