मुंबई(प्रतिनिधी): नागपूर विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी दि. ११ रोजी पाहटे एका प्रौढ वाघाचा मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास एका प्रौढ वाघाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. गोंदिया-बल्लारशाह सेक्शनवरील वाडेगाव-अरुणनगर दरम्यानच्या रूळाजवळ सुमारे चार वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला. ही धडक इतकी भीषण होती की वाघाचे दोन्ही मागचे पाय तुटले होते. अंगावर जखमा झाल्या होत्या आणि चेहरा व कवटी चक्काचूर झाली होती.
गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेला हा सहावा वाघ आहे. या पूर्वी ८ मार्च २०२१ रोजी झाला होता. पिंडकेपार मार्गावरील मालवाहू गाडीने १२ महिन्यांच्या वाघाचा जीव घेतला होता. महाराष्ट्रात दर महिन्याला सरासरी दोन वाघांचा मृत्यू होत आहे. गेल्या पाच महिन्यांत राज्यातील वाघाचा हा १४वा मृत्यू आहे.
वडसा-गोंदिया-बालाघाट हा रेल्वे मार्ग नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून जातो, तर वडसा-चांदा फोर्ट हा मार्ग हा ताडोबा परिसरतून जातो. हे दोन्ही मार्ग, वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्गावर येतात. आणि योग्य उपाययोजना न केल्यामुळे अपघात होऊन मृत्यूला सामोरे जातात.
मानव-प्राणी परस्परसंवाद आणि संघर्ष कमी करण्यासाठी राज्य वन्यजीव बोर्डाने एका समितीचे गठन केले आहे. या समितीमध्ये रस्ते, रेल्वे, सिंचन विभाग, महावितरण या विभागांचा समावेश आहे. रस्ते आणि सिंचन विभ्यागाने वन्यजीव विषयक उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे.परंतु दक्षिण पूर्व मध्य रेल्वे याचा अवलंब करताना दिसत नाही. गेल्या काही वर्षात अनेक वाघ, बिबट्या आणि अस्वलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
"या समितीने समितीने नेहमी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला जंगलातील पॅचमध्ये वेग मर्यादित ठेवण्यास सांगितले आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. आणि ताशी ६० किमी वेग मर्यादित करणे देखील प्रभावी होणार नाही. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रतिनिधीने देखील समितीच्या निर्णयाबद्दल रेल्वे बोर्डाला माहिती दिली नाही." असे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी सांगितले.