नवी दिल्ली : देशभरातल्या गरीब आणि गरजू नागरिकांना अत्यल्प दरात रेशनकार्डवर अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जाते. परंतु, गेली कित्येक वर्षे अनेक अपात्र नागरिकही बनावट रेशनकार्डच्या माध्यमातून सरकारची फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेशनकार्डसंबंधी कठोर निर्णय घेतला असून देशातील लाखो बनावट रेशनकार्ड रद्द करण्यासाठी आता कठोर निर्णय घेण्यात येणार आहे.
बनावट रेशनकार्डचा वापर करून स्वस्त दरात अन्नधान्य खरेदी करणार्या नागरिकांवर कारवाईसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमातील काही नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार अपात्र नागरिकांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. या अनुषंगाने देशातील काही राज्यांनी आपापल्या राज्यात रेशनकार्ड तपासणीचे आदेशही दिले असून रेशन योजनेसाठी पात्र नसलेल्या सर्व रेशनकार्डांची तपासणी करून ते रद्द करण्याचेदेखील आदेशात म्हटले आहे. ज्या नागरिकांकडे चारचाकी वाहने, शस्त्र परवाना आहे, घरात एसी आहे, तसेच जे सरकारी नोकरी करतात, घरातील एखादी व्यक्ती कर भरते, तसेच ज्यांच्याकडे अडीच एकरापेक्षा अधिक जमीन आहे आणि ज्यांचे मासिक वेतन १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा सर्व नागरिकांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. तसेच जे नागरिक शासकीय विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत आणि या योजनेसाठी अपात्र आहेत, त्यांचेही रेशनकार्ड रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.