मुंबई: गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘बीडीडी’ चाळीतील निवृत्त पोलीस कर्मचार्यांना नव्या घरासाठी 50 लाख इतकी किंमत द्यावी लागेल, असे नुकतेच जाहीर केले. या निर्णयामुळे पोलीस बांधवांमध्ये तीव्र नाराजी असून निर्णय होत असताना उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी का आक्षेप घेतला नाही? आमचे सेनेचे वाघ तेव्हा शासन सेवक/अधिकारी यांच्या दबावाला बळी का पडले? असे असंख्य सवाल पोलिसांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, राज्याचे गृहनिर्माणमंत्रीजितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले की, ’बीडीडी’ चाळीच्या प्रत्येक घराचा बांधकाम खर्च हा अंदाजे एक कोटी, पाच लाख ते 1 कोटी, 15 लाख इतका आहे. पण, ‘म्हाडा’ने येथे असलेल्या 2 हजार, 250 पोलीस कर्मचार्यांना तोटा सहन करून 50 लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय करारपत्रात नमूद करून करारपत्र त्वरित दिली जातील. यानिमित्ताने सर्व काम मार्गी लागलेले आहे. तेव्हा आता निवृत्त पोलिसांनी लवकरात लवकर आपली घरे खाली करावीत,” असे आवाहन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.
मात्र, या निर्णयावर ‘बीडीडी’ चाळीतील निवृत्त पोलिसांनी आक्षेप घेतला. याबाबत बोलताना निवृत्त पोलीस कर्मचारी प्रदीप सुर्वे म्हणाले की, “आम्ही निवृत्त झालेले पोलीस कर्मचारी आहोत. ट्रान्सिट कॅम्पची लॉटरी म्हाडाने दोन दिवसांपूर्वी काढली. पोलीस कुटुंब अत्यंत खुश होते. मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. सरकार आणि मंत्री आव्हाडांना आम्ही देवमाणूस म्हणत होतो. मात्र, रात्री अचानक निर्णय आला. 50 लाख आकडा ऐकून आम्ही सर्वच गार पडलो. इतके पैसे आणायचे कुठून? शासनाचे बांधकाम म्हणून मिळणारे पैसे आणि सर्व पकडून आमची ‘कॅपेसिटी’ ही केवळ 15 ते 20 लाखांपर्यंत होती. तेच पैसेही कसे उभे करायचे हा प्रश्न होता. मात्र, आता अनेक वयस्कर लोक आहेत, अनेकांच्या मुलांना नोकर्या नाहीत, अशांनी हे 50 लाख कुठून उभे करायचे, ते रात्रभर झोपले नाहीत. सरकारचे लोक मात्र नायगावमध्ये जाऊन घर खाली करण्यासाठी तगादा लावत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
अचानक पलटी मारली!
मंत्री जितेंद्र आव्हाड आम्हाला बोलले होते की, आम्ही तुम्हाला परवडणारी घरे देऊ. वरळीत येऊन आम्हाला शब्द देऊन गेले होते. बांधकाम खर्च तुम्हाला परवडणारा असेल, असे ते म्हणाले. यामुळे आम्हाला धीर आला होता. मात्र, अचानक त्यांनी हा बॉम्ब टाकला. काय मस्करी चालवली आहे का सरकारने आमची, असे आता वाटायला लागले.
- नीता सुर्वे, अध्यक्ष,पोलीस पत्नी महिला मंडळ