मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५ मि. मी प्रतितास क्षमता असलेली आहे. त्यामध्ये वाढ करून त्यापेक्षा जास्त पाऊस पडला तर पाण्याचा निचरा होईल, या दृष्टीने एक स्वतंत्र आराखडा तयार करा, याबाबत केंद्रीय गृह खात्याच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून मुंबईला अधिकचा निधी मिळणार आहे, अशी माहिती सांस्कृती कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
मुंबईत उद्भवणारी पुर परिस्थिती आणि पाण्याचा निचरा याबाबतच्या उपाय योजनांबाबत दि. २५ जून रोजी आशिष शेलार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, अमित सैनी, अभिजित बांगर यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबईत २०१७ मध्ये एकुण २६ दिवस तर सन २०२४ मध्ये २१ दिवस पाऊस पडल होता. यावरुन असे लक्षात येते की, मुंबईत सरासरी दरवर्षी १६ ते २० दिवस पाऊस पडतो. हा पाऊस एका तासाला १०० मि. मी पेक्षा जास्त असतो असेही पालिकेच्या अभ्यासात समोर आले आहे. सन २०१४ ते २०१९ या कालखंडात तासाला १३१ मि . मी तर १९ मे ला जो पाऊस झाला तो एका तासाला १८२ मि. मी एवढा होता. २६ जुलै २०२५ ला जो जलप्रलय झाला त्यावेळी मुंबईत सुमारे १ हजार मि. मी पाऊस १६ तासात झाला होता तर तासाला १३९ मि. मी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी समुद्राला भरती असल्याने प्रचंड पुराचा फटका मुंबईला बसला होता. आता ही वारंवार १०० मि. मी पेक्षा जास्त पाऊस एका तासाला होत असून त्यावेळी भरती असेल पाण्याचा निचरा होत नाही व पुर परिस्थिचा सामना मुंबईला करावा लागतो.
२६ जुलै २००५ पुर्वी मुंबईची पावसाचा पाण्याचा निचरा करणारी जी गटारे होती त्यांची क्षमता ताशी २५ मि. मी पाऊस झाल्यावर पाण्याचा निचरा करणारी होती. त्यानंतर गठित केलेल्या चितळे समितीने शिफारस केल्या प्रमाणे त्यामध्ये वाढ करुन आता ५५ मि. मी प्रत्येक तासाला पाऊस झाला तर पाणी वाहून नेणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र आता तासाला आता १०० मि. मी पेक्षा जास्त पाऊस होत असल्याने ही क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. याबाबत मुंबई महापालिका ज्या उपाय योजना करीत आहे त्यामध्ये लहान मोठया चार पंपिंग स्टेशनची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे.
सध्या मुंबईत ९ छोटी पंपिंग स्टेशन असून यामध्ये वाढ करुन महाराष्ट्र नगर व धारावी टी जंक्शन येथे दोन नवीन छोटी पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. तसेच सध्या ६ मोठी पंपिंग स्टेशन असून त्यामध्ये वाढ करुन मोगरा व माहुल येथे दोन नवी स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यामुळे कुर्ला आणि अंधेरी येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.
५०० कोटींचा निधी
- मुंबईच्या पुरपरिस्थितीची दखल केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात उपाययोजनांसाठी ५०० कोटींचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मुंबई महापालिकेला उपलब्ध करुन दिला आहे. तसेच शहरातील पुरपरिस्थितीचा अभ्यास करुन एक कृती आराखडा तयार करण्यासही सांगितले असून या कामी मुंबई महापालिकेने जो आराखडा तयार केला त्याचा अभ्यास आयआयटीची तज्ज्ञ समिती करीत आहे.
- ज्या भागात पाणी तुंबते अशी ठिकाणे निवडून त्या भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ही तासाला १०० मि. मी पेक्षा जास्त पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा करु शकेल अशी उभारण्यात येणार आहे. याबाबतचा हा अहवाल आयआयटीच्या मदतीने तयार करण्यात येणार असून सुमारे ५ हजार कोटींचा खर्च यासाठी येईल, असा प्राथमिक अंदाज आहे. या साठी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून मुंबई महापालिकेला मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील तंत्रज्ञानाचा वापर मुंबईतील पाण्याचा निचरा करण्यासाठी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते त्याचाही विचार करुन मुंबई महापालिका हा नवा आराखडा तयार करीत आहे. हा आराखडा तयार करताना मुंबईतील रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीए सह सर्व प्राधिकरणांचा समन्वय व चर्चा करुन हा अहवाल तयार करण्यात यावा, असे निर्देशही यावेळी मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले. हा आराखडा येत्या एक महिन्यात तयार करा, असे निर्देशही मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी दिले.