नवी दिल्ली: राजीव गांधी खटल्यातील आरोपी असलेला एजी पेरीवलान याची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली आहे. तब्बल ३१ वर्षे चाललेला माझ्या आईचा संघर्ष आता संपलाय अशी प्रतिक्रिया पेरिवलन याने या निकालानंतर दिली आहे. कलम १४२ नुसार न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पेरीवलान यांची सुटका केली. राजीव गांधी यांची हत्या ज्या बॉम्बस्फोटात झाली तो बॉम्ब बनवण्यामध्ये ९ वोल्टच्या दोन बॅटरीज वापरण्यात आल्या होत्या ज्या पुरवण्याचा आरोप या पेरीवलान यावर होता. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर २० दिवसांनी त्याला अटक करण्यात आली होती.
२१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरांम्बदूर येथे राजीव गांधी यांची तामिळ दहशतवादी संघटना एलटीटीई कडून हत्या करण्यात आली होती. या वेळी मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधी यांची हत्या झाली होती. या हत्येमागे एलटीटीईचा प्रमुख असलेल्या प्रभाकरन याचा हात होता. याच खटल्यातील अनेक आरोपींपैकी पेरीवलान हा एक होता. पहिले त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्याचे रूपांतर मग ५० वर्षांच्या जन्मठेपेत झाले. आता १८ मे २०२२ रोजी त्याची सर्वोच्च न्यायालयाकडून सुटका करण्यात आली आहे.