(प्रातिनिधिक)
रत्नागिरी : कोकणातील विस्तीर्ण अशा कातळांवर कोरण्यात आलेल्या अश्मयुगीन शिल्पांचा शुक्रवार, दि. २५ मार्च रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान प्राप्त झाले. भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातील आणखी तीन स्थळांचा समावेश झाला आहे. येत्या काही दिवसांत या कातळशिल्पाचे तीन स्तरांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयाकडून सर्वेक्षण करण्यात येईल, त्यानंतर केंद्रीय पुरातत्वीय सर्वेक्षण होईल आणि शेवटी युनेस्कोच्या अधिकाऱ्यांकडून याचे सर्वेक्षण आणि तपासणी होईल.
कुठे आहेत ही कातळशिल्पं...
१) रत्नागिरी (ता. राजापूर) : कशेळी, रुंधेतळी, बारसू, देवी हसोळ, देवाचे गोठणे
२) रत्नागिरी : जांभरूण, उक्षी
३) सिंधुदुर्ग (ता. मालवण) : कुडोपी
४) गोवा (ता. दक्षिण गोवा) : फणसाईमल
(प्रातिनिधिक)
गेल्यावर्षी युनेस्कोच्या यादीत गड किल्ल्यांचा समावेश झाला होता. यावर्षी कोकणातील कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी पुरातत्व विभागाकडून कातळशिल्पांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार युनेस्कोने जाहीर केलेल्या तात्पुरत्या यादीत समावेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कातळशिल्पे साधारण २० वर्षे जुनी असून अश्मयुगीन आणि ऐतिहासिक कलेचा उत्तम नमुना म्हणू याकडे पाहिले जाते. या कातळ कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी रत्नागिरीमध्ये सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, ऋत्विज आपटे आदी निसर्गयात्री या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.