मुंबई : 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर संतप्त एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत. या संदर्भातली माहिती विश्वास नांगरे पाटील यांना अगोदरच होती', अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या विशेष शाखेच्या पत्रातून उघड झाली आहे. असे असतानाही 'हा हल्ला पोलिसांनी का रोखला नाही?' असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
एसटी कर्मचारी अधिक आक्रमक होऊन आंदोलन करणार असल्याचे या पत्रात म्हटले असून, हे पत्र दिनांक 4 एप्रिल रोजीचे आहे. 5 एप्रिल 2022 रोजी न्यायालयाचा निकाल येणार असल्यान 1500 ते 1600 तरुण ये जा करत आहेत, आंदोलनस्थळी आंदोलकांची संख्या वाढतेय, विलीनीकरणाचा निर्णय आपल्या विरोधात जाण्याची जाणीव त्यांना झाली आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भाजप महाराष्ट्र राज्याचेया ट्विटर अकाउंटवरून हे पत्र प्रसारित करण्यात आले आहे. यावेळी 'मा. गृहमंत्रीजी कशाला सिल्वर ओक आंदोलनाच्या चौकशीचा फार्स करताय?, ज्या विश्वास नांगरे-पाटील यांना घटनेपूर्वी माहिती मिळूनही ते मविआच्या सर्वोच्च नेत्याला सुरक्षा पुरवत नाहीत आणि तरीही तुम्ही त्यांनाच चौकशी प्रमुख नेता. जब सैय्या भए कोतवाल, तो डर काहे का?' , असं लिहीत थेट गृहमंत्र्यांना सवाल विचारला आहे.
या आंदोलनानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुरुवातीला अडचणीत आले होते. मात्र आता हे पोलिसांना दिलेले पत्रच बाहेर आल्याने सिल्वर ओक वर पहिल्यांदा पोचणारे वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील हेच अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता पोलिस प्रशासनाला अंदाज असूनही जर महाराष्ट्र सरकारचे सर्वेसर्वा मानले जाणाऱ्या शरद पवार यांच्या घराची सुरक्षा प्रशासन करू शकत नसेल, तर हे प्रशासन माहाराष्ट्राची सुरक्षा कशी करेल? हा मुद्दा उपस्थित होत आहे.