मुंबई : "देशात ईडीच्या सर्वाधिक धाडी या महाराष्ट्रात झाल्या. यात महाविकास आघाडीमधल्या एकूण १४ नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या. मात्र भाजपच्या एकाही नेत्यावर ही वेळ आली नाही.", असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते, आयकर विभाग आणि ईडीकडून होणाऱ्या कारवायांवर भाष्य केले आहे. मंगळवार, दि. ८ मार्च रोजी शिवसेना भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद घेतली ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सुद्धा उपस्थित होते.
देशात ईडीच्या सर्वाधिक धाडी या महाराष्ट्रात झाल्या. यात महाविकास आघाडीमधल्या एकूण १४ नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या. मात्र भाजपच्या एकाही नेत्यावर ही वेळ आली नाही. गेल्या काही दिवसांपासून ईडीने छापेमारी केल्यानंतर आता आयटीची भानामती सुरू झाली आहे. या आयकर विभागाच्या भानामतीमागे नेमकं कोण आहे हे आम्ही लवकरच शोधून काढू.", असा दावा संजय राऊत यांनी केला.
"आज मुंबईत काही ठिकाणी धाडी पडत आहेत. शिवसेनेच्या जवळच्या लोकांवर धाडी टाकायला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे, कार्यकर्ते आहेत, त्याच ठिकाणी धाडी टाकायचे काम सुरू आहे. आमच्या घरात, महाराष्ट्रात जर कोणी घुसत असेल तर शिवसेनेला देखील दुसऱ्यांच्या घरी धाडी टाकण्याचा अधिकार आहे. एकंदर पाहता फक्त महाराष्ट्र आणि बंगालमधल्या ठराविक लोकांनाच लक्ष्य केलं जातंय, असं का?, " असेही ते पुढे म्हणाले.
सरकार पाडायच्या उद्देशाने ईडीच्या धाडी सुरू
"महाराष्ट्रात सुरु असलेल्या धाडी या आमचं सरकार पाडायच्या उद्देशाने सुरू आहेत. ईडीला आणि आयकर विभागाला आतापर्यंत एकूण ५० जणांची यादी पुराव्यांसहित दिली आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही."
ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन
"सध्या ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन बनले आहेत. गेल्या २८ फेब्रुवारीला यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिलं होतं. स्वच्छ भारत अभियानामध्ये नुसता कचरा नाही तर भ्रष्टाचार सुद्धा साफ करायचा आहे. किरीट सोमय्या ईडीचे वसुली एजंट बनले असून ठराविक लोकांनाच टार्गेट केलं जातंय. राज्यातल्या व्यावसियाकांना आणि बिल्डरांना धमकाविण्याचे काम करण्यात येत आहे."
देशातील सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं हे रॅकेट मुंबई आणि दिल्लीत बसून चालवलं जातं
"देशातील सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं हे रॅकेट मुंबई आणि दिल्लीमध्ये बसून चालवलं जात आहे. ईडीचे एक नेटवर्क खंडणी गोळा काम करण्याच्या कामात व्यस्त असून आतापर्यंत १०० पेक्षा जास्त बिल्डर्सकडून ईडीने वसुली केली आहे."