पुणे: सर्वसामान्य भारतीयांचे दुचाकीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या 'चेतक' चे निर्माते जेष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या पार्थिवावर रविवारी नव्या पेठेतील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काही दिवसांपासून बजाज यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांदरम्यान शनिवारी दुपारी २.३० वाजता त्यांचे निधन झाले. भारत सरकार कडून २००१ साली त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत असे आदेश दिले होते.
इटालियन दुचाकी 'वेस्पा' हिला 'चेतक' च्या स्वरूपात आणून त्यांनी भारतीय मध्यमवर्गीय माणसाचे दुचाकीचे स्वप्न पूर्ण केले होते. त्यांची 'हमारा बजाज' ही धून आणि चेतक भारतीयांच्या मनात कायम कोरल्या गेल्या आहेत अशीच भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होते आहे. १० जून १९३८ रोजी जन्मलेल्या राहुल बजाज यांनी १९६८मध्ये बजाज उद्योगसमूहाची धुरा खांद्यावर घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज उद्योगसमूहाने यशाची कित्येक शिखरे गाठली. फक्त उद्योगपती हीच त्यांची ओळख नव्हती तर एक मोठे दानशूर व्यक्ती म्हणूनही त्यांचा परिचय सर्वांना होता. बजाज उद्योगसमूहाची देशाला योगदान देण्याची परंपरा राहुल बजाज यांनी कायम राखली होती.
राहुल बजाज यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांचे पार्थिव आकुर्डीतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले होते. बजाज कंपनीतल्या कामगारांनीही बजाज यांचे दर्शन घेतले. "राहुल बजाज उद्योगविश्वात उल्लेखनीय योगदान दिले. व्यवसायापलीकडे, त्यांना समाजसेवेचीही आवड होती. उद्योगक्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील." अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली.