संदीप देशपांडे
मुंबई : महाराष्ट्रातील फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार युवकांना रोजगार देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रमाची जाहिरात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये छापून आली होती. या जाहिरातींवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सामनावर सर्वच स्तरांतून टीका होत असून ठाकरेंची निष्ठा केवळ पैशांवरच आहे, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. गुरुवारी एका वृत्तवाहिनीला बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, 'एका बाजूला ठाकरे गट राज्य सरकारवर टीका करताना हे सरकार खोके सरकार असून अनैतिक आणि असंवैधानिक आहे असा आरोप करत आहे. राज्य सरकारवर आरोप करत असतानाच दुसरीकडे मात्र हीच मंडळी राज्य सरकारच्या जाहिराती आपल्या दैनिकात छापत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राज्यभर फिरून शिंदे गट आणि भाजपवर आरोप करत असताना ठाकरे मात्र सर्रासपणे पैसे कमविण्यासाठी हे उद्योग करत आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी ठाकरेंची निष्ठा हे केवळ पैशांवरच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे,' असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.