पेण : मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. धूळ, धुरळा, धुळवड अशी अवस्था या महामार्गाची झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना उफाळली आहे.
या महामार्गाच्या रस्ते रुंदीकरणाचे काम गेली दहा ते १२ वर्षे सुरु असूनही महामार्ग सुस्थितीत झाला नसल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवानंतर डांबरीकरणाचे काम सुरू होणे गरजेचे होते. मात्र, रस्त्यावर पडलेले खड्डे कायम असून खड्ड्यांच्या त्रासाबरोबर आता नव्याने वाहनचालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, दमा, घशाचे आजार, डोळ्यांचे विकार या आजारांनी डोके वर काढले आहे.
महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी वापरलेली खडी, रेती व माती पूर्णपणे रस्त्यावर पसरली असून या रेती, खडीवरून मोटार सायकल घसरण्याचे प्रमाण वाढले असून उडणार्या धुळीच्या लोटामुळे समोरील रस्ताही दिसेनासा होत आहे. यातून सातत्याने प्रवास करावा लागत असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. महामार्गावरील जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या गोवा गेट ते डोलवी दरम्यान मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्याबरोबरच त्या ठिकाणी अनधिकृतपणे वाहनांची पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे डोलवी परिसरातील नागरिकांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गणेशोत्सवापूर्वी पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात खड्डे पडले होते. यासाठी सोबती संस्था, ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ व पेण पत्रकार यांनी ‘खड्डे भरो’ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. महामार्गाच्या या दुरवस्थेची गावोगावी जनजागृती करून वातावरण निर्मिती केली जात आहे. याची दखल घेत वडखळ मार्गावरील ठेकेदार बदलून नवीन ठेकेदारांकडून दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.