पुणे : “काँग्रेस हा निवडून न येणारा पक्ष आहे. राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद सोडायला नको होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सामना करण्याची हिंमत ठेवायला हवी होती. पण, त्यांच्यात ती हिंमत नाही,” असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. तसेच, “2024 मध्ये 400 पेक्षा अधिक जागा मिळतील, असे नियोजन आहे. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील. त्यांच्या मंत्रिमंडळात मी नक्की मंत्री असेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरीत रिपाइं आठवले गटाच्या राज्य महिला आघाडीचा मेळाव्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री आठवले बोलत होते. या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, महिला आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा कमल कांबळे, जगदीश गायकवाड, सुजित कांबळे उपस्थित होते. ते म्हणाले की, “उद्योजकांना बळजबरी करता येत नाही. उद्योग इथेच टाका, असे म्हणता येत नाही. तसा कायदाही नाही. गुजरातमध्ये भाजप बलवान पक्ष आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकल्प घेऊन गेले, असे मला वाटत नाही.”
“मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास रिपाइंला उपमहापौर पद द्यावे. पुण्यातदेखील रिपाइं पक्षाचा उपमहापौर होता. तशीच अपेक्षा मुंबईबाबत आहे,” असेही आठवले म्हणाले. “राज्यातील सरकार स्थापन करताना भाजपसोबत शिवसेनेने आघाडी करणे गरजेचे होते. मात्र ते झाले नाही. परिणामी, शिवसेनेत बंड झाले. सध्या शिवसेना खिळखिळी झाली असून त्याला उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
“रिपाइंकडूनही ‘गाव तिथे शाखा’ ही मोहीम सुरू करून महिलांवरील अन्यायाला वाचा फोडू. महिलांवर अत्याचार करणार्याला फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या विविध कमिट्या, महामंडळ या वरदेखील रिपाइंला जागा द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे,” असे केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले.