उद्या, सोमवार, दि. 9 ऑगस्ट रोजी श्रावण मासारंभ. त्यानिमित्ताने भारतीय संस्कृतीतील श्रावण महिन्याचे पावित्र्य, महात्म्य आणि उत्सवी परंपरेचे चित्रण करणारा हा लेख...
‘श्रावण’ हा शब्द म्हणताच डोळ्यासमोर निसर्गाचे मनमोहक रूप उभे राहते. श्रावण म्हणजे मांगल्याचे, उत्साहाचे प्रतीक असलेला महिना असे वर्णन करता येईल. आषाढात भरभरून पडलेल्या पावसामुळे श्रावणात नदीनाले तृप्त होऊन वाहत असतात आणि सगळी धरती हिरव्या रंगाने न्हाहून निघते. झाडांची पाने टवटवीत होतात. अनेक फुलांना बहर आलेला असतो. निसर्गाच्या जणू कणाकणांतून चैतन्यच पाझरताना दिसते. निसर्गातील याच समृद्धीचा आविष्कार आपल्या धार्मिक-सांस्कृतिक पातळीवरही झालेला दिसतो. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणउत्सवाला कृषीसंस्कृतीचे अधिष्ठान असल्यामुळे ते निसर्गचक्राशी जोडलेले आहेत. त्यातून श्रावणात निसर्ग आपल्या अनंत हातांनी सौंदर्याची मुक्तपणे उधळण करीत असतो. त्यामुळे इतर महिन्यांपेक्षा श्रावणाच्या वाट्याला जास्त कोडकौतुक आले आहे आणि म्हणूनच श्रावणातील प्रत्येक दिवसच सण म्हणून साजरा होतो.
श्रावण हा वर्षा ऋतूत येणारा आणि चैत्रादी वर्षातील पाचवा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणून याचे ‘श्रावण’ असे नाव आहे. (श्रवणर्क्षं पौर्णमास्यां ततोऽपि श्रावण: स्मृत:) किंवा या महिन्याचे माहात्म्य श्रवण करण्यास योग्य आहे (श्रवणार्हं यन्माहात्म्यं तेनासौ श्रवणो मत:) म्हणून याचे नाव ‘श्रावण’ अशी देखील व्याख्या आहे. वैदिक काळात याचे ‘नभस्’ असे नाव होते. अमरकोशात ‘श्रावण:’, ‘नभा:’ आणि ‘श्रावणिक’ अशी याची नावे सांगितली आहेत. गीतेत भगवंतानी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम्’ म्हटले असले तरी विविध पुराणांनी श्रावणाचे महात्म्य सांगितले आहे. ‘द्वादशस्वपि मासेषु श्रावणो मेऽतिवल्लभ:’ म्हणजे ‘बाराही महिन्यात हा महिना मला सर्वात प्रिय आहे,’ असे स्वत: महादेव शिवपुराणात म्हणतात. श्रावण म्हणजे श्रवण करण्याचा महिना म्हणून या महिन्यात विविध ग्रंथांचे पारायण, मंदिरात रोज कीर्तन-प्रवचन केले जातात. श्रावणात निसर्ग थोडा विसावलेला असतो. पर्यायाने माणसेदेखील थोडी निवांत होत उपासतापास, मनन, चिंतन करू लागतात. धर्म, अध्यात्म आरोग्य, पर्यावरण, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक समन्वय, लोकसाहित्य अशा सगळ्याच दृष्टीने श्रावण महिना महत्त्वपूर्ण ठरतो.
आयुर्वेदानुसार या काळात शरीरातील कफ आणि वात-दोषाचे प्राबल्य वाढते, तसेच जठराग्नी मंद झालेला असतो. म्हणून वर्षा ऋतुचर्येप्रमाणे या काळात लंघन करणे किंवा पचायला हलके खाणे हितकारक आहे. श्रावणात विविध व्रतांच्या निमित्ताने उपवास केला जातो. तसेच मांसाहार, चमचमीत पदार्थ टाळून सात्त्विक हलका आहार घेतला जातो. नैवेद्याचे साळीच्या लाह्या, फुटाणे, सुंठवडा हे पदार्थ कफशामक आहेत. आरोग्यनियमांना धार्मिक अधिष्ठान दिल्याने आपसूकच ऋतुचर्येचे पालन होते.
धार्मिकदृष्ट्या श्रावणाचे महत्त्व इतर महिन्यांपेक्षा अधिक आहे. विविध पुराणांमध्ये तसेच ‘निर्णयसिन्धु’, ‘व्रतराज हेमाद्रीकृत चतुर्वर्ग चिंतामणी’ इत्यादी ग्रंथांत श्रावणातील अनेक व्रते सांगितली आहेत. यातील काही व्रते आज प्रचलित नाहीत. ‘स्मृतिकौस्तुभ’ या ग्रंथात श्रावण शु. प्रतिपदेला ‘मृगशीर्ष व्रत’ सांगितले आहे. श्रावण शु. तृतीयेला ‘स्वर्णगौरी व्रत’ केले जाते. शु. चतुर्थीला ‘दूर्वागणपतिव्रत’ करावे, असे सौरपुराणात म्हटले आहे. श्रावण शु. पंचमी म्हणजे ’नागपंचमी’ या दिवशी नागांचे पूजन केले जाते. श्रावण शु. षष्ठीला ‘वर्णषष्ठी’ हे व्रत करत पूजेनंतर शिवाला वरणभाताचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच याला ‘सुपोदन षष्टी’ म्हणत स्त्रिया पानावर तांदूळ व वाल ठेवून वाण देतात. ‘शीतला सप्तमी’ला शीतलादेवीची आणि जलाशयाची पूजा करण्याची पद्धत आहे. शु. अष्टमीला दुर्गाव्रत करून देवीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. शु. एकादशीला देवाला पवित्रक अर्पण केली जातात. शु द्वादशीला दधिव्रत सांगितले असून विमानारूढ भगवान विष्णूंचे पूजन करून दह्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्रयोदशी श्रावणातील प्रदोष म्हणून अधिक महत्त्वपूर्ण मानली जाते. शु. चतुर्दशी किंवा पौर्णिमेजवळील शुक्रवारी ‘वरदलक्ष्मी’ व्रत केले जाते. पौर्णिमेला ‘श्रावणी कर्म’ करत नवीन यज्ञोपवीत धारण केले जाते.
श्रावण कृष्ण प्रतिपदेला ‘धनावाप्ती’ व्रताचा आरंभ करून विष्णूची निळ्या कमळांनी पूजा केली जाते. कृ. द्वितीयेला ‘सुखी दाम्पत्य’ जीवनासाठी ‘अशून्यशयन व्रत’ सांगितले असून यात लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते. कृ. चतुर्थीला गणपतीची पूजा करून लाडवांचा नैवेद्य दाखवून लाडू दान करण्याचे व्रत सांगितले आहे. कृ. पंचमी ‘सर्पविषापह पंचमी’ म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी सापांची पूजा करण्याचे विधान आहे. कृ. षष्टीला ‘चंद्रषष्ठी’ हे व्रत करत रात्री चंद्राची पूजा केली जाते. श्रावण कृ. सप्तमीला ‘ललितासखी’ व्रत सांगितले असून यात नदीजवळ वाळूच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. कृ. अष्टमीला मध्यरात्री भगवान कृष्णांचा जन्म उत्सव करून ‘जन्माष्टमी व्रत’ केले जाते. श्रावणी अमावास्येला ‘पिठोरी अमावास्या’ असे नाव असून या दिवशी 64 योगिनींची पूजा केली जाते.
श्रावणात दररोज त्या त्या वारानुसार व्रतवैकल्येदेखील केली जातात. सोमवारी नक्त उपवास करत शिवपूजन केले जाते. तसेच तांदूळ, तीळ, मूग, जवस व सातू या धान्यांची शिवामूठ शिवाला वाहिली जाते. मंगळवारी नववधू मंगळागौरीची पूजा करून हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजरा करतात. बुधवारी बुधाची आणि गुरूवारी बृहस्पतीची पूजा करतात. शुकवारी जिवती देवीची पूजा करून सुवासिनींना दूध-फुटाणे देत हळद-कुंकू केले जाते शनिवारी शनी, मारूती, नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात. रविवारी आदित्य राणूबाईची पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. श्रावणात जशी तिथी आणि वारांची व्रते आहेत, तशी नक्षत्रांवर करायची व्रतेदेखील सांगितली आहेत. श्रावण शु. अष्टमीला ज्येष्ठा नक्षत्र असल्यास ‘नीलज्येष्ठा’ व्रत केले जाते. रोहिणी नक्षत्रावर चंद्र रोहिणी यांची पूजा करत रोहिणी व्रत करण्यास सांगितले आहे. श्रवण किंवा हस्त नक्षत्रावर उपाकर्म केले जाते. व्रतवैकल्यांची इतकी विविधता इतर कुठल्याच महिन्यात नाही.
श्रावणातील व्रतांइतक्याच वैशिष्ट्यपूर्ण श्रावणातील कहाण्या आहेत. सातही वारांच्या, ‘नागपंचमी’, ‘शीतलासप्तमी’ अशा व्रतांच्या, विविध देवांच्या या लहान कहाण्यांतून विविध व्रतांचे महात्म्य अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे. ‘आटपाट’ नगरात घडणार्या या कथा ‘उतू नकोस मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस’ असे वारंवार बजावतात. मुले-बाळे, गुरे-वासरे, आजारी वृद्ध यांना अतृप्त ठेऊन ईश्वराला तृप्त करता येत नाही, हे तत्त्वज्ञान खुलभर दुधाच्या कहाणीतली म्हातारी सोप्या भाषेत सांगते. संपत्तीने उन्मत्त होऊन रक्ताची नाती अव्हेरू नये, हे शुक्रवारची कहाणी शिकवते. भारतीय मनाचे गोष्टीवेल्हाळपण जाणून या कहाण्यातून जीवन ‘सुफळ संपूर्ण’ होण्यासाठी नीतिमूल्यांची नकळत पेरणी होते. पुराणात सुत-शौनक, शंकर-पार्वती अशा विविध प्रश्नोत्तरातून सांगितलेले व्रतांचे प्रदीर्घ ‘साठा उत्तराचे’ महात्म्य या कहाण्यांत अगदी थोडक्यात ‘पाचा उत्तरात’ सांगितले असते. या कहाण्यांचा काळ, रचनाकार याविषयी अनभिज्ञता असली तरी मौखिक परंपरेने त्या पिढ्यान्पिढ्या चालत आल्या आहेत. सोपी, लहान वाक्ये, रसाळ भाषा, नादयुक्त शब्दरचना, आशयघनता, मानवी स्वभावाचे नेमके चित्रण अशा वैशिष्ट्यांमुळे मराठी लोकसाहित्यात श्रावण कहाण्यांचे स्थान वेगळे ठरते.
भारतीय स्त्रियांच्या भावविश्वात श्रावणाचे वेगळे स्थान आहे. पूर्वी व्यापार, युद्ध मोहिमा यांच्यासाठी परदेशी गेलेले पुरुष आषाढात पहिला मेघ दिसला की, घरी परतू लागत आणि श्रावणासोबत त्यांच्या येण्याने आनंदित झालेल्या त्यांच्या ‘प्रोषितभर्तुका’ नायिकांना श्रावण सखा वाटत असे. रोजच्या जीवनात श्रावणातील सण-उत्सव यांमुळे नवीन रंग भरले जात असत. दिवसभर घरच्या कामात बुडालेल्या स्त्रियांना शिवमूठ, शुक्रवारचे हळदी-कुंकू यानिमित्ताने बाहेर पडता यायचे. नागपंचमीला झोके, मंगळागौरीचे खेळ यानिमित्ताने मनसोक्त खेळता यायचे. आजच्या काळात स्त्रिया रोजच घराबाहेर पडत असल्या, तरी श्रावणाचे महत्त्व अजूनही टिकून आहे. ‘श्रावणी अमावस्या’ हा मातृदिन म्हणजे भारतीय ’मदर्स डे.’ पतीच्या दीर्घायुष्यासाठी ‘मंगळागौर’, अपत्यांच्या सुखी जीवनासाठी जिवतीचे पूजन, भावाच्या रक्षणासाठी रक्षाबंधन, कुटुंबाच्या कल्याणासाठी विविध व्रते यांच्या माध्यमातून पत्नी, आई, बहीण, गृहिणी अशा स्त्रीच्या सगळ्या रूपांना श्रावण समृद्ध करतो. ‘नागपंचमी’चे झोके असोत की, ‘मंगळागौरी’चे खेळ आजच्या स्त्रियादेखील कामाच्या व्यापातून वेळ काढत मनसोक्त आनंद लुटतात.
श्रावण महिना संपूर्णपणे सण-उत्सावांचाच असल्यामुळे महिनाभर उपवासाच्या आणि बिन उपवासाच्या पदार्थांची अगदी रेलचेल असते. नागपंचमीला उकडलेले पदार्थच करण्याची प्रथा असल्याने पुरणाचे दिंड, पातोळ्या, उकडीच्या करंज्या, पात्या असे प्रांतागणिक विविध पदार्थ केले जातात. शिळा सप्तमीला ताजा स्वयंपाक न शिजवता आदल्या दिवशी सोवळ्यात करून ठेवलेल्या शिळ्या अन्नाचा नैवेद्य दाखवून खाण्याची प्रथा आहे. यात थालपीठ, वेगवेगळे लाडू, धपाटे, सांजोर्या अशी पदार्थांची रेलचेल असते. श्रावणात उपवास सोडताना सांज्याच्या पोळ्या, खिरी, घारगे असे वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात. आदित्य राणूबाईचे रोट नारळी पौर्णिमेचा नारळीभात, जन्माष्टमीनंतर गोपाळकाला, पिठोरी अमावस्येला तवसाच्या वड्या हे खास श्रावणातच केले जाणारे पदार्थ आहेत. हिरवळीने नेत्रसुखाचा आनंद देणारा श्रावण अशाप्रकारे जिव्हासौख्याचाही अनुभव देतो.
श्रावणाच्या परीसस्पर्शापासून भारतीय संगीतदेखील सुटले नाही. श्रावणातील ढगांचे गंभीर गर्जन, हलक्या सरी, चमकणारी वीज यांचे चित्रण शास्त्रीय संगीतातील अनेक बंदिशींमध्ये आदळते. ‘मल्हार’ या वर्षाकालीन रागकुळातील रागांच्या अनेक बंदिशींमध्ये ‘रितू बरखा’ ,’सावन’ अशा रूपांतून श्रावणाची अनेक रूपे खुलवली जातात. उत्तर भारतात उपशास्त्रीय लोकसंगीताची समृद्ध परंपरा आहे. यात ‘कजरी’, ‘झूला’ ‘सावनी’, ‘बुन्दिया’ असे खास श्रावणात गायले जाणारे संगीत प्रकार आहे. महाराष्ट्रातदेखील नागपंचमीची हिंदोळ्याची गाणी, मंगळागौरीची गाणी, नारळी पुनवेची कोळीगीते, कीर्तने, गवळणी अशा लोकगीतात श्रावण डोकावतो.
आज तंत्रज्ञानाच्या युगात या प्रथापरंपरांचे संदर्भ बदलेले असले तरी आजही श्रावणाचे महत्त्व अबाधित आहे. किंबहुना, निसर्गापासून दूर झालेल्या तंत्रशुष्क आयुष्याला पुन्हा निसर्गाशी जोडण्यास यातून मदत होते. जगण्याच्या धावपळीत व्यस्त झालेले सगे-सोयरे सणांच्या निमित्ताने एकत्र येतात. रक्षाबंधन, हळदी-कुंकू यांच्या माध्यमातून नात्यांची वीण घट्ट राखली जाते. श्रावणातील व्रते रोजच्या एकसुरी दिनचर्येत बदल आणतात. शारीरिक आरोग्यासाठी उपवास, मानसिक आनंदासाठी व्रते-उत्सव आणि बौद्धिक चिंतनासाठी उत्तम ग्रंथांचे वाचन या माध्यमातून श्रावण वर्षभरासाठी उर्जा देतो.
परंपरांचे जतन करताना आवश्यक तिथे काही बदल करणेदेखील गरजेचे आहे. श्रावणी शुक्रवारी सधन सवाष्णीसोबत गरजू महिलांना मानाने बोलवून जेवू घातले, तर ते कहाणीतल्या आशयाला अनुसरून ठरेल. गरजू विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करणे हा खरा संपत शनिवार आणि चिमूटभर धान्य शिवपिंडीवर वाहून उरलेले धान्य गरजूंना देणे ही खरी ‘शिवमूठ.’ ‘रक्षाबंधन’ सण फक्त आपल्याच नाही, तर समाजातील सगळ्या बहिणींचे रक्षण करण्याचे नैतिक कर्तव्य शिकवतो. समाजातील सगळ्या घटकांमधील सौहार्द आणि एकजूट हा कृष्णाला अपेक्षित गोपाळकाला. नागापासून बैलापर्यंत निसर्ग साखळीतील सगळ्या घटकांना महत्त्व देत त्यांचे रक्षण करण्याचा संदेश श्रावण देतो. परंपरांमागचा आशय समजून घेत, निसर्गाशी असलेली नाळ पुन्हा जोडत श्रावणाचा हा वसा घेतला तर कहाण्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपले जीवन नक्कीच ‘सुफळ संपूर्ण’ होईल!