संवेदनशील वस्ती म्हणून रमाबाई आंबेडकर नगराचा पुनर्विकास नाही!
मुंबई : संवेदनशील वस्ती आहे म्हणूनच माता रमाबाई आंबेडकर नगराचा पुनर्विकास होत नाही, असा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून होत आहे.येथील 30 फुटांचा रस्ता अतिक्रमणामुळे सात फूट झाला. मात्र, संवेदनशील वस्ती म्हणून या अतिक्रमणावर कारवाई होत नाही. त्यामुळे रहिवासी सोसायट्यांपर्यंत वाहने पोहोचणार कशी? सुविधा निर्माण होणार कशा? या चिंतेने आजपर्यंत 25 विकासकांनी नगरातील पोलीस दक्षता सोसायटीच्या पुनर्विकासास नकार दिला आहे.
माता रमाबाई आंबेडकर नगरातील पोलीस दक्षता सोसायटीमध्ये 400 घर पोलिसांची आहेत. इथे पूर्वी म्हाडाचा ‘ट्रान्झिस्ट कॅम्प’ होता. या कॅम्पमधील घरांवर अनेकांनी अवैध अतिक्रमण केले होते. कंटाळून ‘म्हाडा’ने हा भूखंड कायदेशीररित्या पोलिसांसाठी दिला. त्यावेळी 400 पोलीस आपल्या कुटुंबासह येथे राहण्यास आले. दिवसरात्र काम करणार्या पोलिसांना हक्काचे संकुल मिळाले. पोलीस दक्षता सोसायटी स्थापन करण्यात आली. सोसायटीला पुनर्विकास प्रकल्प राबवायचा आहे. जवळजवळ 25 विकासकांनी या सोसायटीच्या पुनर्विकासासंबंधी रस दाखवला.
मात्र माता रमाबाई आंबेडकर नगराच्या प्रवेशद्वारापासून पुढे या सोसायटीपर्यंत जाणारा रस्ता या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला नकारघंटा ठरत आहे. कारण, 2000 साली हा रस्ता 30 फुटांचा होता. आता तो पेरीवाला आणि दुकान घराच्या अतिक्रमणाने सात फुटांचा झाला आहे. विकासकांचे म्हणणे आहे की, पोलीस दक्षता सोसायटीचा पुनर्विकास केला तरी इथली घरे कोण विकत घेणार? कारण, या सोसायटीपर्यंत यायला रस्ताच नाही. त्याचा फटका पोलीस दक्षता सोसायटीला बसल्याचा स्थानिकांचे म्हणणे आहे