ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे लसीकरणाचे तीन तेरा वाजले असताना आता चक्क जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्याचा प्रताप पालिकेने केला आहे. कोरोनातुन बरे झालेल्या ठाण्यातील ५५ वर्षीय शिक्षकाला व्यक्तीला चक्क मृत असल्याचा फोन महापलिकेने करून खातरजमा केल्याने सदर व्यक्तीच्या पायाखालची वाळूच सरकली. दरम्यान, या धक्कादायक घटनेने भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याने महापालिका प्रशासनाने ही तांत्रिक चुक असल्याची सारवासारव करून वेळ मारून नेली आहे.
ठाण्यातील मानपाडा येथे राहणाऱ्या चंद्रशेखर देसाई यांना ऑगस्ट २०२० रोजी कोरोनाची लागण झाली होती, दरम्यानच्या काळात होम क्वारंटाईन राहून घरच्याघरीच उपचार घेऊन देसाई बरे झाले.पेशाने शिक्षक असलेल्या देसाई यांना मंगळवारी अचानक ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिलेचा फोन आला. आधी घरच्या पत्याची विचारपूस या महिलेने केली,नंतर...चंद्रशेखर देसाई हे कधी मृत झाले ? आम्हाला नोंद करायची आहे ? तसेच त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र तयार करायचे असल्याचे या महिलेने फोनवरून सांगितले. या महिलेचे हे संभाषण ऐकून देसाई यांच्या पायाखालची वाळूच सरकली.त्यानी आपण स्वतःच बोलत असुन जिवंत असल्याचे त्यांनी या महिलेला सांगितले.
दरम्यान चंद्रशेखर देसाई यांनी त्वरित महापालिका मुख्यालयात धाव घेऊन आरोग्य विभागाकडे तक्रार केली. मी जिवंत असताना मला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार आपणासोबत घडल्याचे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर पालिकेच्या या कारभारावर नाराजी व्यक्त करत, हा फोन मला आला मात्र हाच फोन जर माझ्या कुटूंबियांपैकी कोणाला केला गेला असता. तर अनर्थ झाला असता,त्यामुळे ठाणे महापालिकेने निदान नोंदणी तरी व्यवस्थित करावी.अशी सूचना देसाई यांनी केली आहे.
आरोग्य विभागाची तांत्रिक चूक
रुग्ण कोरोना बाधित झाल्यानंतर बरा होईपर्यंत ठाणे महापालिका पाठपुरावा करत असते.त्यानंतर कुटुंबातील कोणाला कोरोनाची लागण झाली आहे का? अशीदेखील विचारपूस करण्यात येते.तांत्रिक कारणामुळे हा गैरसमज झाला.कोरोना रुग्णांच्या यादीमुळे अशी चूक झाली असावी.मात्र पुन्हा अशी चूक होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल.असे मत मनपा उपायुक्त संदीप माळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.