मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी तसेच मुंबईतील वरळी येथील निवासस्थानीही आज २५ जून रोजी सकाळी ईडीने छापेमारी केली. ईडीकडून झाडाझडती सुरु असतानाच अनिल देशमुख वरळीतील अनिल देशमुख मुंबईतल्या वरळीतील सुखदा निवासस्थानी दाखल झाले आहेत.
देशमुखांशी संबंधित ५ ठिकाणी या धाडी पडल्या आहेत. नागपुरातील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी व सुखदा याठिकाणी ईडीने छापेमारी केली. सकाळी ८ वाजल्यापासूनच ही कारवाई सुरु झाली आहे. सुरूवातील अनिल देशमुख दिल्लीला असल्याची माहिती मिळत होती. मात्र या कारवाई दरम्यानच देशमुख वरळीतील सुखदा या निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे ईडी अनिल देशमुखांची चौकशी करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. ईडीच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देशमुखांच्या नागरपूर येथील निवासस्थानी जमायला सुरुवात केली. आक्रमक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना बार मालक आणि इतरांकडून १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र लिहिले होते. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत असतानाच मे महिन्यात ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक व्यवहाराच्या अँगलने ईडीनेही या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.