मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्घटना मालवणी भागातील अनधिकृत बांधकामं आणि त्याकडे असलेले प्रशासनाचे दुर्लक्ष या बाबी दर्शवते असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. भाजप नेत्यांनी यावर ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
मालाड येथे इमारत कोसळून काही लोकांचे प्राण गेल्याची घटना अतिशय दुःखद आहे. या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेत जखमी झालेल्यांना लवकर आराम मिळावा, अशी प्रार्थना करतो.या कुटुंबियांना तातडीने मदत द्यावी, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी! - मा.मु व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
भाजप प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी या दूर्घटनेतील 11 लोकांचा मृत्यूही शिवसेना शासित मुंबई महानगरपालिके कडून योजनाबद्ध हत्या आहे .जर वेळेत अनधिकृत उंची रोखली असती, वसूलीचे धंदे थांबवलेले असते तर हे दुर्दैवी मृत्यू रोखता आले असते, असा आरोप केला आहे.शिवसेना, मुंबईमहापालिका घेणार का या हत्येची जबाबदारी?असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
पुढे राम कदम म्हणाले की, आता या दुर्घटनेत ११ जणांचे जीव गेले आहेत. तर ७ जण जखमी आहेत. तसेच मृतामध्ये ८ बालकांचा समावेश आहे. यातील मृतांच्या जखमींच्या वारसांना काही लाख रुपयांची मदत जाहीर केली जाईल. मात्र त्या २ - ५ लाखांमुळे ते जीव परत येणार आहेत. जर वेळीच काळजी घेतली असती तर हे जीव वाचले असते. त्यामुळे त्यांच्या हत्येची जबाबादारी शिवसेना किंवा मुंबई महापालिका घेणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
” मालवणी परिसरात पावसामुळे इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आणि ७ जण जखमी झाले आहेत. या सर्वांबद्दल संवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेमुळे या परिसरातील अवैध बांधकामाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. मी स्थानिक प्रशासनाला विनंती करतो की या प्रकरणात त्यांनी लक्ष द्यावं.” असं ट्विट मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे.“सरकारी यंत्रणा झोपा काढतायत. निर्दोषांचे बळी जातायत. मालवणी येथे इमारत कोसळून मृत पावलेल्या ११ नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.” असं ट्विट मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.