राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! नद्यांनी पातळी ओलांडली; 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी
16-Jun-2025
Total Views |
मुंबई : राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रविवारी, मध्यरात्रीपासून मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागांतील वाहतूक खोळंबली आहे. विशेषत: दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर दिसून येतोय. भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील ३ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
उल्हासनगरमध्ये जुना पूल पडल्याने नागरिकांचा ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच पुण्यातही अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून पुण्यात ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. नागपूरसह विदर्भात पुढील दोन दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.