मुंबई : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यापासून विरोधक महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलने करू लागली आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणासाठी लढणारे खासदार संभाजीराजे यांनी सर्व पक्षांच्या प्रमुखांशी भेटीगाठी केल्या. त्यानंतर रविवारी, त्यांनी महाराष्ट्र सरकारला ६ जूनपूर्वी मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे असा अल्टीमेटम दिला आहे. आता त्यांनी 'सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे' असा आरोप केला आहे.
खासदार संभाजीराजे यांनी ट्विट केले आहे की, "सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाही, की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?" असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीला विचारला आहे. सध्या संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर आंदोलनासाठी विविध राज्यांत दौरे करत आहेत. नुकतेच, सोमवारी त्यांनी सिंधुदुर्गला भेट दिली. त्यांच्या या ट्विटने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापणार असे दिसत आहे.