नागपूरच्या ‘नीरी’ संस्थेचे अभिनव संशोधन
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांपासून करोना चाचणी करणारी आरटी – पीसीआर पद्धती विकसित झाली आहे. नागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या मार्गदर्शनाखाली ही अभिनव पद्धती विकसित करण्यात आली आहे.
नीरीच्या पर्यावरणीय विषाणू संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ कृष्णा खैरनार यांनी सदर पद्धतीची माहिती दिली. ते म्हणाले, स्वॅब गोळा करण्याच्या पद्धतीला वेळ लागतो. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे, हे आत साधन घालून, स्वॅब काढण्याचे तंत्रज्ञान असल्याने, रुग्णांसाठी ते जरा त्रासदायक असते. त्याशिवाय, काही दुर्गम, ग्रामीण भागातून, गोळा केलेले नमुने संकलन केंद्रांत आणण्यासाठी वेळ जातो. दुसरीकडे मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याची आरटी-पीसीआर पद्धत ही जलद, आरामदायक आणि रुग्ण-स्नेही पद्धत आहे. त्याचे नमुने लगेच संकलित केले जातात आणि निष्कर्ष तीन तासांत मिळू शकतात.
अशी आहे पद्धत
व्यक्तीने मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यावर रुग्णाने ते पाणी विशिष्ट नलिकेत जमा करायचे आहे. हा नमुना मग प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. तिथे सामान्य तापमानात, नीरी ने तयार केलेल्या एका विशिष्ट द्रावणात ते मिसळून ठेवले जाते. त्यानंतर जेव्हा हे द्रावण गरम केले जाते, त्यावेळी, आरएनए टेम्प्लेट तयार होते. या आरएनए मधून पुढे आरटी-पीसीआर म्हणजेच, रिव्हर्स ट्रान्सक्रीप्शन पॉलिमरेस चेन रिएक्शन (RT-PCR) प्रक्रिया केली जाते. नमुना संकलनाच्या आणि प्रक्रियेच्या या विशिष्ट पद्धतीमुळे आरएनए वेगळे काढण्याच्या महागड्या प्रक्रियासाठी लागणाऱ्या खर्चाची बचत होते.
ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये, जिथे पायाभूत सुविधांची कमतरता आहे, तिथे चाचण्यांसाठी ही अभिनव चाचणी प्रक्रिया विशेष उपयुक्त ठरणार आहे. या तंत्रज्ञान-विरहित (non-technique) चाचणी पद्धतीला आयसीएमआरने मान्यता देण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान देशभरात सगळीकडे वापरता यावे, यासाठी नीरीने या चाचण्यांचे प्रशिक्षण इतर प्रयोगशाळांमधील तंत्रज्ञांना द्यावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.