मुंबई (प्रतिनिधी) - 'जागतिक आरोग्य संघटने'नुसार (डब्लूएचओ) जगभरात हवा प्रदूषणाने दरवर्षी जवळपास ७० लाख लोक मरण पावतात. 'लॅन्सेट हेअल्थ जर्नलचा रिपोर्ट'नुसार महाराष्ट्रामध्ये दरवर्षी १.८ लाख लोकांना प्रदूषित हवेमुळे मृत्यूला सामोरे जावे लागते. देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची संख्या (१९ शहरे) महाराष्ट्रात आहे. याच धर्तीवर 'वातावरण' या संस्थेने हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या चर्चा सत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये तज्ज्ञ डाॅक्टरांनी आपली मते मांडली.
पुण्यातील 'पल्मोकेअर रिसर्च अँड एज्युकेशन'चे संचालक डॉ. संदीप साळवी म्हणाले की, प्रदूषित हवा ही केवळ घराबाहेरील वातावरणातच असते आणि हवा प्रदूषणाचे स्त्रोतही घराबाहेरच असतात, असा बहुतांश लोकांचा समज असतो. मात्र, हा समज चुकीचा आहे. घरात मच्छर मारण्यासाठी लावलेली एक काॅईलही १०० सिगारेट्स ओढल्यावर जेवढे घातक प्रदूषण आपल्या शरीरात जाते तेवढे घातक प्रदूषण घरात तयार करते. आपण घरात जाळणारी एक धूप अगरबत्ती ही ५०० सिगारेट्सएवढे प्रदूषण करते. आजही ग्रामीण भागात जेवण बनवण्यासाठी चुलीचा वापर केला जातो. त्यात जाळले जाणारे जे घटक आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण हे सीओपीडीचे मुख्य कारण ठरताना दिसत आहेत. केवळ औद्योगिक क्षेत्रातून किंवा वाहनांमुळे हवा प्रदूषण होते, हा समज चूकीचा आहे. आपणही या प्रदूषणात व्यक्तिगतरित्या भर घालतो हे प्रत्येकाने मान्य करायला हवे. के.इ.एम. रुग्णालय, मुंबईच्या डॉ. अमिता आठवले यांनी सांगितले की, मूले, महिला आणि वयोवृद्ध लोक सर्वाधिक वेळ घरात राहतात. त्यामुळे घरातील प्रदूषण हा आरोग्याला धोका निर्माण करणारे मुख्य कारण ठरत आहे. घरातील प्रदूषण छोटेखानी असल्याने त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हे येणाऱ्या काळात घातक ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नानावती सुपर स्पेशालिटी रुग्णालय, मुंबईच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. अदिती शहा यांनी हवा प्रदूषणामुळे नवजात बालकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले. सहा महिन्यापर्यंत नवजात बालकांचे फुफ्फुस पूर्णतः विकासित झालेले असते. अशा काळात लहान मुलांचा संपर्क जर प्रदूषित हवेशी आल्यास त्यांना कायम स्वरूपी फुफ्फुसासंबंधी आजारांना सामोरे जावे लागू शकते. गेल्या १० वर्षामध्ये लहान मुलांमध्ये अशा प्रकारच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले असल्याचे आहे. 'लीड इंटर्वेंशनल आणि पल्मोनोलॉजिस्ट, क्रीम्स रुग्णालय, नागपूर'चे डॉ. समीर अर्बट म्हणाले, हवा प्रदूषण हे फुफ्फुसासंबंधी आजार होण्यामागे आणि ते वाढण्यामध्ये महत्वाचे कारण आहे. हवा प्रदूषण हे फुफ्फुसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आघात करते. त्यामुळे आम्हाला श्वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. प्रदूषणाच्या धोक्याला वेळीच आळा घालणे महत्वाचे आहे. वायू प्रदूषणामुळे २०१७ ते २०१९ दरम्यान झालेल्या एक लाख मृत्यूंसह उत्तरप्रदेशाखालोखाल महाराष्ट्र याबाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.