दि. २० एप्रिलला सायंकाळी आबासाहेब पटवारी यांच्या निधनाचे वृत्त समजले आणि सुमारे २०-२२ वर्षांपूर्वीचे दिवस डोळ्यासमोर आले. त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
१९९८च्या डिसेंबर महिन्यातील गोष्ट. त्यावेळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉ. मोहनजी भागवत यांनी (सध्याचे प.पू. सरसंघचालक) असे आवाहन केले होते की, प्रत्येक गावात वर्षातून एकदा संपूर्ण हिंदू समाज एकत्र यावा. सर्वजण जाती, पंथ, पक्ष, भेद विसरून एखादा उत्सव-सण साजरा करतील का, यासाठी एक छोटीशी बैठक झाली, ज्यामध्ये पत्रकार सुधीरजी जोगळेकर यांनी वरील विषयाची मांडणी केली आणि सहजच आग्रह केला की, हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने करावा. पण, संपूर्ण हिंदू समाजाने सहभागी व्हावे, असे असेल.
एखाद्या धार्मिक संस्थेने पुढाकार घ्यावा, असा विचार पुढे आला. त्यावेळी मी रा. स्व. संघाचा कल्याण-डोंबिवली महानगर कार्यवाह होतो. आमच्या बैठकीत चर्चा झाली होती. कार्यक्रम कोणत्या संस्थेच्या नावाने करायचा? त्याच वर्षी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिराला ७५ वर्षे पूर्ण झाली आणि आबासाहेब पटवारी ‘श्रीगणेश मंदिर संस्थान’चे अध्यक्ष झाले होते. ‘श्री गणेश मंदिर संस्थान’नेच हा कार्यक्रम करावा, असा विचार झाला. त्यासाठी सुरुवातीला आबासाहेब पटवारी यांच्याशी बोलू आणि मगच कार्यक्रमाच्या निश्चितीकडे येऊ, असे ठरले.
दादासाहेब कल्लोळकर (विभाग संघचालक) आणि मधुकरराव चक्रदेव (जिल्हा संघचालक), प्रदीपजी पराडकर (जिल्हा कार्यवाह) यांनी आबासाहेबांशी बोलणे केले. त्यांनी नम्रपणे सांगितले की, “हा विषय विश्वस्त मंडळाशी बोलून नक्की करू.” त्याचवेळी मला सुचवले की, डोंबिवलीतील तरुणांची बैठक घेणार का? त्यांनी सुचवल्याप्रमाणे बैठक नक्की केली. आबांना आग्रह केला की, या बैठकीत आपण सर्वांना मार्गदर्शन करावे. बैठकीचा दिवस ठरला. दि. १४ फेब्रुवारी, १९९९. स्थान होते डॉ. हेडगेवार सभागृह, राणा प्रताप भवन. त्या बैठकीला सुमारे १५० तरुण उपस्थित होते. आबासाहेब पटवारी यांनी नववर्ष स्वागत यात्रेची कल्पना मांडली. सर्वांच्या सूचना घेतल्या. समारोपात त्यांनी म्हटले की, “एखादी रेष लहान करायची तर ती पुसणे हा उपाय नाही, बाजूला मोठी रेष काढणे हा उपाय आहे.”
अतिशय चांगल्या पद्धतीने तरुणांना प्रोत्साहित करणारे भाषण आबासाहेबांनी केले. बैठक नक्की करताना केवळ रविवार, सर्वांना सुट्टी एवढाच विचार आम्ही केला होता. आबासाहेबांनी बोलताना त्या दिवशीच्या तारखेचा म्हणजेच १४ फेब्रुवारीचा उल्लेख केला. आपल्याला ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या प्रथांना विरोध करण्यात वेळ न घालवता, चांगल्या रूढी, प्रथा सुरू करता येतील. म्हणून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा सुरु करुया, असे नक्की केले. त्याची तयारी करताना डोंबिवलीतील सर्व कर्तृत्ववान लोकांना कार्यकर्त्याच्या भूमिकेत सक्रिय केले. वाजपेयी सर, मधुकरराव चक्रदेव यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी अक्षरशः पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे कामाला सुरुवात केली आणि सर्वांना आधार होता तो आबासाहेबांचा! एप्रिलमध्ये गुढीपाडवा होता. सर्व तयारी झाली आणि नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ झाला.
पुढल्या वर्षी म्हणजे २००० साली नववर्ष स्वागत यात्रा ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, गिरगाव इ. ठिकाणी सुरू झाली. या सर्व ठिकाणी हिंदुत्वप्रेमी नागरिकांची बैठक घेणे, त्यांच्यासमोर स्वागत यात्रेचा विषय मांडणे, एखाद्या धार्मिक संस्थेला पुढाकार घेण्यास तयार करणे, यासाठी आबासाहेबांनी प्रवास केला. त्या पुढील काही वर्षे आबासाहेब संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करत आणि नववर्षे स्वागत यात्रा सुरू करण्यासाठी समाजमन तयार करत होते. त्याचाच परिणाम म्हणून केवळ भारतातच नाही, तर जगात जिथे जिथे हिंदू समाज आहे, तिथे तिथे नववर्ष स्वागत यात्रा सुरु झालेल्या पाहायला मिळतात.
ही कल्पना प्रत्यक्षात आणून सर्वत्र रूढ करणे याचे श्रेय नक्कीच आबासाहेब पटवारी यांना जाते. यानिमित्ताने काही चांगल्या उपक्रमांची जोड या स्वागत यात्रेला दिली. जसे एक वर्ष ‘भटके- विमुक्त प्रतिष्ठान’च्या यमगरवाडीच्या वसतिगृहासाठी एक मूठ धान्य देण्याचे आवाहन लोकांना केले. गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत गोळा केलेले काही ट्रक धान्य यमगरवाडीला पाठवले. संघ संस्कारामुळे समाजपरिवर्तनाचे काम स्वयंसेवक कसे करून दाखवतो, याचेच हे उदाहरण. यात्रेचे निमित्त आणि सलग सात दिवस कार्यक्रम, ज्यामध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक सर्वांचा सहभाग होता. आबासाहेब सर्व कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवून त्यांचा आत्मविश्वास वाढवत.
आबासाहेबांनी डोंबिवलीसाठी भरपूर काही केले. ते नगराध्यक्ष असताना कॉलेजची सुरुवात झाली. त्या संस्थेच्या स्थापनेत तर ते होतेच, पण कॉलेजला स्वतःची इमारत नव्हती म्हणून नगरपालिकेच्या शाळेची इमारत उपलब्ध करून दिली आणि त्यात सुरुवातीला वर्ग भरवले. माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. हे काम करताना ३०-३५ वर्षांनी मोठे असलेले आबासाहेब केव्हा मित्र झाले, हे कळलेच नाही. आज मात्र ‘अरे यदू!’ अशी आपुलकीची हाक दुरावली.
- श्रीपाद जोशी
९२२३५३४७९२
(लेखक रा. स्व. संघ कोकण प्रांताचे संपर्क प्रमुख आहेत.)