ठाणे : शहापूरातील तांदूळ व्यापारी रमेश अग्रवाल (वय ५९) यांच्यावर मंगळवार, दि. २७ एप्रिल रोजी रात्री ८.३०च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. हल्लेखोर फरार झाले असून शहरातील गंगा रोड भागातील राईसमिल बाहेर घडलेल्या या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल यांना अधिक उपचारांसाठी ठाण्यातील ‘ज्युपिटर’ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी, शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली.
शहापूर शहरातील गंगा रोड भागातील राईसमिल बाहेर दुचाकीवरून घरी जात असताना अन्य एका दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी अग्रवाल यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल यांना उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान हल्ल्यामागचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान,हा भ्याड हल्ला धर्माधांनी केल्याचे बोलले जात असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची चर्चा रंगली आहे.