मुंबई - महाराष्ट्रामध्ये २०२१ च्या सुरुवातीपासून भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये २६ टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालामधून ही आकडेवारी समोर आली आहे. १ जानेवारी, २०२१ ते २४ एप्रिल, २०२१ या कालावधीत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सर्वात जास्त पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा क्रमांक लागत आहे.
एसीबीने भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी अटक केलेल्या आरोपींकडून लाखो रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. यामध्ये अटक केलेल्या पोलीसांकडून ११ लाख ५८ हजार १०० रुपये, ताब्यात घेतलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांकडून १० लाख ५ हजार ५०० रुपये आणि महसूल अधिकाऱ्यांकडून ९ लाख, ४५ हजार ४०० रुपयांच्या लाजेच्या रक्कमेचा समावेश आहे. म्हणजेच दाखल झालेल्या २४४ प्रकरणांमधील लाजखोरीची एकूण रक्कम ६१.८९ लाख रुपये आहे.
आकडेवारीनुसार, एसीबीने जानेवारीच्या सुरूवातीपासून २५ एप्रिलपर्यंत २५४ नवीन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या ३४२ जणांना अटक करण्यात आली आहे. या तुलनेत गेल्यावर्षी याच कालवधीदरम्यान एसबीने २०१ गुन्हे दाखल करुन त्यामाध्यमातून २८२ लोकांना ताब्यात घेतले होते. यंदा नोंदवलेल्या २५४ प्रकरणांपैकी ५३ गुन्हे हे महसूल विभागावर दाखल झाले असून ७३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या घटनांबाबत पोलीस विभागामधून ७७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे, तर विविध महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर २२ गुन्हे दाखल झाले असून त्याव्दारे ३३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
औरंगाबाद (७९), नाशिक (५८), पुणे (५७), ठाणे (४०) आणि मुंबई (३२) या शहरांमध्ये एसीबीने सर्वाधिक प्रकरणे नोंदवली आहेत. एसीबीच्या एका अधिकाऱ्याने निवेदनात म्हटले आहे की, “गेल्या काही वर्षांपासून पोलीस आणि महसूल विभागामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे कमी प्रकरणे नोंदविण्यात आली होती. मात्र, लॉकडाउन उठल्यानंतर पुन्हा यामध्ये वाढ होऊ लागली आहे."