मुंबई : संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कोविडमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशामध्येच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ माध्यमातून दि. १९ एप्रिल २०२१ पासून विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे प्रत्यक्ष स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. परंतु,सद्यस्थितीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील वातावरण अतिशय गंभीर आहे. अशा परीस्थितीत परीक्षांचे आयोजन करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखा प्रकार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक विद्यार्थी व कुटुंबातील सदस्य कोविड सदृश आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाही. याच कारणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याचा विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने विचार करत आगामी काळात होणाऱ्या परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्यात याव्यात आणि परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी अभाविप कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी केली आहे.