फडणवीसांनी केली सचिन वाझेंच्या अटकेची मागणी
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सचिन वाझे हे व्यवसायाच्या निमित्ताने ओळखीचे असल्याचे सांगितले आहे. माझ्या पतीचा खून झाला असावा आणि तो सचिन वाझे यांनी केला असावा असा मला संशय आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. त्यावर गृहमंत्र्यांनी उत्तर देताना कारवाई न केल्याने विरोधक आक्रमक झाले आणि सभागृहात "सरकार खुनी आहे" अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या.
मनसुख हिरेन यांची पत्नी विमल हिरेन यांचा खुलासा:
अंबानींच्या घरासमोर सापडलेली कार सचिन वाझे यांना चालवण्यास दिली होती. ही कार चार महिने सचिन वाझे यांच्याकडे होती असे हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे. सचिन वाझे यांनी तीन दिवस माझ्या पतीची चौकशी केली. पोलीस आणि पत्रकार त्रास देत असल्याचे तक्रारपत्र सचिन वाझे यांनी माझ्या पतीकडून दाखल करून घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, "दि. ३ मार्च २०२१ ला माझे पती ९ वाजता घरी आले. आणि त्यांनी सांगितले की, सचिन वाझे त्यांना अटक व्हायला सांगत होता" असाही खुलासा मनसुख हिरेन यांची पत्नी विमल हिरेन यांनी केला.
कलम २०१ अंतर्गत वाझेंना अटक करा:
मनसुख हिरेन यांचे शेवटचे लोकशन विठ्ठल गावडे यांच्या इथले होते. त्यामुळे कलम २०१ खाली सचिन वाझे यांना अटक का झाली नाही? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या गाडीत झाली असून ती खाडीत टाकण्यात आली असावी, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.