नवी दिल्ली : गेल्या कित्येक दिवसांपासून कृषी आंदोलनावर ठेवण्यात आलेले मौन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेतील अभिभाषणात सोडले. शेतकरी आंदोलनाबद्दल भाष्य करताना परकीय अदृश्य शक्ती आणि 'आंदोलनजीवी' या शब्दांवर वजन देत आंदोलकांना टोला लगावला आहे. तसेच तुमच्या मागण्यांसाठी सिंघु सीमेवर वयोवृद्ध मात्यापित्यांना थांबवून ठेवणे योग्य नाही, थेट चर्चेसाठी या केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर या चर्चेसाठी तयार आहेत, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशात आता 'एफडीआय' म्हणजेच 'फॉरेन डिस्ट्रक्टिव आइडियोलॉजी'पासून स्वतःला वाचवले पाहिजे. तसेच एका आंदोलनजीवी जमातीपासूनही सावध व्हायला हवे. जो विरोधी पक्ष कधी काळी शेतकरी हिताचा विचार करत होता, तेच लोक आता सरकारने लागू केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांवर प्रश्न उपस्थित करत आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांनी लक्षणीय उत्पादन केले आहे. देशातील खाद्याचे भंडार भरलेले आहेत."
"देशात श्रमजीवी आणि बुद्धीजीवी विचारांपेक्षा आता आंदोलनजीवी ही नवी जमात उदयाला येत आहे. विद्यार्थी आंदोलन असो वा शेतकऱ्यांचे जिथे शक्य होईल, तिथे हे लोक पोहोचतात. हे आंदोलनकर्ते लोकांना भरकटवण्याचे काम करत असतात. कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या आणि आंदोलनाला समर्थन देणाऱ्या विदेशींचाही समाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. 'एफडीआय' म्हणजे जी 'फॉरेन डिस्ट्रक्टिव आइडियोलॉजी' हा प्रकार आहे. कोरोना काळातही सीमेवर तणाव करण्यात शेजारील देशांनी कुठलीही कसूर सोडली नाही. मात्र, आपल्या जवांनांनी हिंम्मतीने सामना केला. सीमा सुरक्षेबद्दल आम्ही काही स्वस्थ बसणारे नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे.", असे मोदींनी म्हटले.
काँग्रेस खासदार बाजवा यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "ज्यावेळी खासदार बोलत होते तेव्हा मला वाटले की आणीबाणी काळात शिखविरोधी दंगलींबद्दलही ते वक्तव्य करतील. मात्र, त्यांनी ते केले नाहीत. पश्चिमी देशांतील संस्कृती विचार आपल्याला प्रभावित करू शकत नाहीत, हा आपला इतिहास आहे. भारतावर होणाऱ्या या हल्ल्यांपासून आपल्याला सावध रहायला हवे. आपण जगाच्या विचारांनी प्रेरित होऊन पुढे जातो मात्र, आपला आदर्श विसरुन जातो. आपण केवळ एक मोठी लोकशाही नाही तर आपला देश याचे एक मूळ आहे हे येणाऱ्या पीढीला आपण सांगायला हवे."
मोदी है मोका देखिये !
सोशल मीडियावरून केलेल्या टीकेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज राज्यसभेत अखेरच्या काही मिनिटांत भाष्य केले. देशातून शेतकरी आंदोलनात होत असलेल्या विरोधातून माझ्यावर होणारी टीका मी पाहीली आहे. मी तुमच्यासाठी या कामी आलो याचा मला आनंद आहे. लॉकडाऊनमध्ये घरबसल्या तितका विरंगुळा तुम्हाला मी देऊ शकलो याचेही मला समाधान आहे.